Nagpur News नागपूर : मतमोजणीच्या दिवशी स्टँगरुममधून काढल्या जाणाऱ्या ईव्हीएम बदलणार तर नाहीत ना??? अशी शंका काँग्रेसला (Congress) आहे. म्हणूनच काँग्रेसच्या (Congress)केंद्रीय नेतृत्वाने देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सावध राहण्याची आणि स्टँगरुमवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केला आहे. निवडणूक आयोग सरकारचा आणि त्यापेक्षाही जास्त मोदींचा पाठीराखा आहे. निवडणूक आयोगाने गेल्या काही दिवसात अनेक वेळेला स्वतःचेच नियम पायदळी तुडवले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि सरकारच्या दबावात असलेल्या प्रशासनाच्या भूमिकेवर आम्हाला शंका असल्याचे नितीन राऊत म्हणाले आहेत. एवढंच नाही तर पराभूत झाल्यानंतर मोदी (PM Modi) एवढ्या सोप्यारीत्या सत्ता हस्तांतरित करणार नाही, ते काही ना काही गडबड करतील, असा खळबळ जनक दावाही राऊत यांनी केला आहे. 


पंतप्रधान मोदी पराभूत झाल्यानंतर गडबड करतील- नितीन राऊत


अठराव्या लोकसभा निवडणुकांची शनिवारी सांगता झाली आहे. देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळी संपल्यावर साऱ्यांची उत्सुकता असलेल्या एक्झिट पोलचे (Result 2024 Exit Poll) आकडे समोर आले आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष असल्याचं एबीपी सी वोटरच्या एक्झिट (ABP Cvoter Exit Poll) पोलमध्ये समोर आले आहे. तर एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई असल्याचं दिसत आहे. तर यावरून आता अनेक दावे-प्रतिदावे केले जात असतानाच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी खळबळ जनक दावा करत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


पराभूत झाल्यानंतर मोदी सत्ता हस्तांतरित करणार नाही, ते काहीतरी गडबड करतील. असेही राऊत यांनी म्हटले आहे. प्रचंड बहुमताच्या नंतरही 1989 मध्ये पराभव झालेल्या राजीव गांधी यांनी सहजरित्या सत्ता सोडली होती. मात्र मोदी तसं करतील असं आम्हाला वाटत नसल्याचेही राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, अमित शहा यांनी निवडणूक सुरू असताना अनेक जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधले, हे नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोपही नितीन राऊत यांनी केलाय. 


व्हीव्हीपॅट काय आहे?


व्हीव्हीपॅट एक स्वतंत्र मत पडताळणी यंत्र आहे. व्हीव्हीपॅट मशील ईव्हीएमला जोडल्यानंतर मतदाराला मतदानाची पावती मिळते. यामुळे आपले मत आपण योग्य उमेदवाराला दिलं आहे का, हे तपासता येतं. सध्या निवडणूक आयोगाकडून सर्व ईव्हीएमला व्हीव्हीपॅट मशीन जोडण्यात येत नाही. कोणत्याही पाच ईव्हीएमला रँडम पद्धतीने व्हीव्हीपॅट मशीन जोडून पडताळणी केली जाते. पण, याचिकाकर्त्यांनी सर्व ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडून मतांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.