Maharashtra Lockdown : 50 टक्के नागरिकांचं लसीकरण झालं तरच लॉकडाऊन उठू शकतो, असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे. लॉकडाऊन एकदम उघडला जाणार नाही, परंतु सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा विचार नक्की करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे. कॅबिनेट बैठकीत याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. हॉटेल, सलून व्यावसायिक, इलेक्ट्रिक दुकानांना दिलासा देण्याचा निर्णय टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री घेतील असंही अस्लम शेख म्हणाले आहेत.


अस्लम शेख बोलताना म्हणाले की, "जोपर्यंत मुंबई शहर आणि महाराष्ट्रात 50 टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊनमध्ये कोणताही दिलासा देणं हे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊनमध्ये कसा दिलासा देता येईल, काय नियम असतील, कोणत्या दुकानांना परवानगी देता येईल याचा विचार सुरु आहे. टास्क फोर्स याबाबत सूचना करतील. त्यानंतर कॅबिनेटमध्ये योग्य तो निर्णय घेऊन, यासंदर्भात घोषणा केली जाईल."


पाहा व्हिडीओ : 'लॉकडाऊन एकदम उघडला जाणार नाही, परंतु सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा विचार': मंत्री अस्लम शेख



चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन उठणार? 


देशात कोरोना संसर्ग फोफावत असताना मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात काहीसं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. अशातच सध्या लागू करण्यात असणाऱ्या लॉकडाऊनला येत्या काळात कोणतं वळण मिळणार याबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. 



  • 1 जूननंतर राज्यातील काही भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल होण्याची शक्यता.

  • ज्या जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. त्या जिल्ह्यात 'ब्रेक द चेन' चे काही नियम शिथिल केले जातील.

  • ज्या जिल्ह्यात संसर्ग कमी झाला नाही त्या जिल्ह्यात ब्रेक द चेनचे नियम कायम राहतील आणि त्याचा अधिकार त्या जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल. 

  • 'ब्रेक द चेन' चे नियम शिथिल करताना वेगवेगळ्या टप्प्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता.

  • सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवण्याचा निर्णय 1 जून नंतर होऊ शकतो.

  • ज्या जिल्ह्यांमध्ये कोरणा चा संसर्ग कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकान उघडी ठेवण्यास सुद्धा परवानगी देण्याची तयारी.

  • मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सध्यातरी बंदच राहणार.

  • धार्मिक स्थळे ही सध्या तरी बंद ठेवण्यात येणार आहेत.

  • जिल्हाबंदी सध्या तरी कायम राहण्याची शक्यता आहे. 


सर्वसामान्यांसाठी मुंबईल लोकलचा प्रवास पुढील 15 दिवस नाहीच : विजय वडेट्टीवार


मुंबईतील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, पण संपलेला नाही. लोकल ट्रेन आम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवल्या आहे आणि त्याचा परिणाम दिसत आहे. काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावे लागतील. सरसकट सूट दिली तर गर्दी होईल. त्यामुळे लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.


राज्यातील 15 जिल्ह्यात लॉकडाऊनचा प्रभाव नाही, महसूलमंत्र्यांनी बोलवली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक


राज्यातील कोणकोणते जिल्हे रेड झोनमध्ये?


राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर नुकतीच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंधरा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची  बैठक बोलावली होती.  बुलढाणा (Buldhana), कोल्हापूर(kolhapur), रत्नागिरी(Ratnagiri), सांगली(sangli), यवतमाळ(yavatmal), अमरावती(amravati), सिंधुदुर्ग(Sindhudurga), सोलापूर(Solapur), अकोला(Akola),सातारा (Satara), वाशीम (Washim), बीड (Beed), गडचिरोली(Gadchiroli), अहमदनगर (Ahemdnagar), उस्मानाबाद (Osmanabad) या पंधरा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असून देखील रुग्णसंख्या कमी होत नसल्याची माहिती आहे. 


दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अशातच राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा आलेख आता उतरणीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु, 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार की निर्बंध हटवणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :