Maharashtra Live Update: मान्सूनपूर्व पावसाचा फटका कोकणातील दुर्गम आणि ग्रामीण भागाला! 25 ते 30 गावं अंधारात

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 May 2024 12:08 PM
खंडाळा घाटात बॅटरी हिलजवळ भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

Accident News : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिल जवळ एक कंटेनर आणि कारच्या दरम्यान भीषण अपघात झाला असून या अपघातात कार मध्ये बसलेल्या दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर एका अवघड वळणावर पलटल्याने हा अपघात झाला आहे. लोणावळ्याकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात या रस्त्याला तीव्र उतार आणि वळण आहे. याच ठिकाणी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर हा समोरून येणाऱ्या कारवर पलटला. सदर कार ही अलिबाग वरून तळेगाव दभाडेच्या दिशेने निघाली होती. या कारमध्ये तळेगाव येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करीत होते.
या अपघातात कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर योगेश चौधरी, जान्हवी चौधरी, दिपांशा चौधरी, जिगिशा चौधरी, मितांश चौधरी, आणि भूमिका चौधरी, हे सहा जण जखमी झाले आहे. सर्व जखमींना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 Kokan News :  मान्सूनपूर्व पावसाचा फटका कोकणातील दुर्गम आणि ग्रामीण भागाला! 25 ते 30 गावं अंधारात

 Kokan News :  कोकणात मागील चार ते पाच दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत आहे. दरम्यान, याचा परिणाम हा ग्रामीण भागात झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली आहे. परिणामी वीज पुरवठा खंडित झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील पूर्व भागाताल जवळपास 25 ते 30 गावं मागील पाच ते सहा दिवसांपासून अंधारात आहेत. वीज नसल्यानं पाण्याअभावी देखील नागरिकांचे हाल होत आहेत. तर मोबाईल सेवेवर देखील परिणाम झाला आहे. महावितरणकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. पण, दुर्गम आणि ग्रामीण भाग असल्यानं मर्यादा येत आहेत. दरम्यान, लवकरच विज पुरवठा सुरळीत केला जाईल असं महावितरणनं सांगितलं आहे. 

Chandrapur News: रेल्वेच्या धडकेत तीन चितळांचा मृत्यू

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत तीन चितळांचा मृत्यू झालाय. नागभीड तालुक्यातील तळोधी भागातील जंगलातून जाणाऱ्या बल्लारशा-गोंदिया रेल्वे ट्रॅक वर ही दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री 10  च्या सुमारास घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले आणि मोक्का पंचनामा करून मृत चितळांचा अग्नी दिला. मृत चितळांपैकी एक दीड ते दोन वर्षे वयाचा तर दोन चितळ अंदाजे तीन ते साडेतीन वर्षे वयाचे असून त्यापैकी एक मादा चितळ हे गर्भावस्थेत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे गोंदिया-बल्लारशाह रेल्वे लाईन ही ताडोबा आणि ब्रह्मपुरी वन विभागाच्या जंगलामधूनच गेलेली असल्यामुळे या रूटवर अनेक वन्यजीव मृत पावल्याच्या घटना घडतात. मात्र यावर अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

Nashik News : कांदा चाळीत आढळले बिबट्याचे बछडे.

Nashik News : नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अंबासनच्या मोराणे सांडस शिवारात एका कांदा चाळीत बिबट्याचे बछडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे..हे बछडे मादीपासून चुकल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.वनविभागाने त्यास ताब्यात घेत त्यावर प्राथमिक उपचार करून पुन्हा मादीकडे बछडे सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली..

Pune News: पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा : वडेट्टीवार

Pune News:  पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारूत पित असल्याचे CCTV फुटेज असून ही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय.  





Kokan News: रत्नागिरी आणि लांजा तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीपात्रात बोट सफारीची मजा लुटता येणार

Kokan News: कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आता फिरण्यासाठी आणखी पर्याय खुला झाला आहे. रत्नागिरी आणि लांजा तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीपात्रात बोट सफारीची मजा लुटता येणार आहे. कांदळवन अभ्यास, पक्षी निरीक्षण आणि बोट सफारी अशा पद्धतीची ही मजा असणार आहे. कांदळवन फाउंडेशनच्या वतीने नाचणे गावातील काही महिला आणि पुरुषांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आता काजळी नदीच्या पात्रात गुड सफारी करणं शक्य होणार आहे. ही बोट सफारी करण्यासाठी सध्या पर्यटकांची पावलं देखील हळूहळू काजळी नदीच्या पात्राकडे वळत आहेत. 25 मेपर्यंत जलक्रीडा पर्यटनाला परवानगी असल्याने या मोसमात आणखीन केवळ काहीच दिवस ही बोट सफारी सुरू राहणार आहे. 

Water Level :  देशातील प्रमुख 150 धरणात लक्षणीय घट

Water Level :  देशातील प्रमुख 150 धरणं आणि साठवण तलावांच्या पाणीसाठ्यात यंदा मे महिन्याच्या मध्यात लक्षणीय घट झाली आहे. सध्या एकूण साठवण क्षमतेच्या केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी ३३ धरणांमध्ये सर्वसाधारण साठवण मर्यादेच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. यात महाराष्ट्रातील जायकवाडी, मुळा, उजनी, भंडारदरा, माणिकडोह या प्रमुख धरणांचा समावेश आहे. उजनी धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. 

 Nagpur News: नागपुरात जातीचे खोटे दाखले बनवून नामांकित शाळांमध्ये प्रवेश

 Nagpur News: नागपुरात जातीचे खोटे दाखले आणि इतर खोटे डॉक्युमेंट्स बनवून नामांकित शाळांमध्ये आपल्या मुलांचे आरटीई अन्वये प्रवेश करून घेणाऱ्या 19 पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर सिताबर्डी आणि सदर या दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Bhandara News: वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी भंडाऱ्यात अंडरपास वाहतूक

Bhandara News: वन्य जीवांचा अधिवास असलेल्या परिसरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची भरधाव वर्दळ असते.. अनेकदा वाहनांच्या धडकेत वन्यप्राण्यांचे जीव गेलेत..त्यामुळे वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग आणि भारतीय वन्य जीव संस्थेच्या पुढाकारातून जंगल परिसरात अंडरपासची निर्मिती करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात तीन तर, भंडाऱ्यात एका ठिकाणी अंडरपासचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Hingoli : अंधारवाडीत टँकरनं पाणीपुरवठा,महिलांची पाण्यासाठी झुंबड

Hingoli : सूर्य आग ओकत असताना हिंगोलीत पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागतेय... मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून हिंगोली शहरालगत असलेल्या अंधारवाडीत टॅंकरनं पाणी विहरीत सोडलं जातंय. या विहिरीवरून पाणी नेण्यासाठी गावातील महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत... 

Ashadhi Wari : संत गजानन महाराजांची पालखीचं 13 जून रोजी होणार शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान

Ashadhi Wari : आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूर येथे जात असते. यंदाही पालखी १३ जून रोजी शेगाव येथून पंढरपूर साठी प्रस्थान करणार आहे याचा सर्व नियोजनाची तयारी आता संत गजानन महाराज संस्थान करत आहे यंदा दिंडीचे हे ५५ व वर्ष असून जवळपास सातशे वारकऱ्यांसह राज वैभवी थाटात या दिंडीचं १३ जून रोजी प्रस्थान होणार आहे या दिंडीत ७०० वारकरी , २५० पताकाधारी २५० टाळकरी २०० सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी १३ जून रोजी प्रस्थान होणार आहे . 

Sinhgad Road Closed : सिंहगड किल्ल्यावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत दुरुस्तीसाठी बंद

Sinhgad Road Closed : सिंहगड किल्ल्यावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार. मात्र अतकरवाडी मार्गे चालत गडावर जाता येणार. धोकादायक दरडी दुरुस्त करण्यासाठी वन विभागाचा निर्णय. (वाचा सविस्तर) 

Vikhe Patil : राज्यात 45 दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती

Vikhe Patil :  राज्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होईल हा विचार करूनच राज्य सरकारने ऍडव्हान्स प्लॅनिंग केल्याचे दुग्ध व पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात 45 दिवस  पुरेल इतका चारा उपलब्ध आहे ... या परिस्थितीत जर चारा डेपो सुरु करावे लागले तर चारा उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले...

Buldha News:  सिंदखेड राजा येथे उत्खननात सापडलं पुरातन शिवमंदिर

Buldha News:  बुलढाण्यातील सिंदखेज राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या समाधीसमोर जीर्णोद्वाराचे काम सुरू असताना उत्खनन करताना तेराव्या शतकातील यादवकालीन पूर्व मुख्य शिवमंदिर सापडलं आहे. भारतीय पुरातत्व विभागाकडून या मंदिराची पाहणी केली. हे मंदिर सापडल्याने पुरातत्त्व विभागाच्या अधिक्षकांनी या मंदिराची पाहणी केली. 

Shirdi Accident :  नाशिकमध्ये खासगी ट्रॅव्हलर्स बसला आग

Shirdi Accident :  शिर्डी येथून भाविकांना घेवून सप्तशृंग गडाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हलर बसला भीषण आग लागली.  सुरुवातीला गाडीतून अचानक धूर येऊ लागल्यानं प्रसंगावधान राखून २१ प्रवाशांना खाली उतरवलं. या आगीत ही बस जळून खाक झालीय.  चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशांचे प्राण वाचले.  

 11 th Admission : ११वी प्रवेशासाठी २४ मेपासून नोंदणीला सुरुवात

 11 th Admission : ११वी प्रवेशासाठी २४ मेपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. यंदा दोन विशेष फेऱ्या होणार आहेत.त्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या होणार आहेत. एफसीएफएस ही फेरी होणार नाही. प्रत्येक फेरीसोबत विविध कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया समांतर सुरू राहणार आहेत. तसंच ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी सराव करता यावा यासाठी २२ आणि २३ मे हे दोन दिवस देण्यात आले आहेत.

HSC Result: बारावीच्या परीक्षेचा आज निकाल

HSC Result:  महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.. दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.. त्यानंतर महाविद्यालयांमध्ये त्यांना गुणपत्रिका वितरीत केल्या जातील. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


पुण्यात भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या वेदांत अगरवालचे वडील आणि बांधकाम व्यायवसायिक विशाल अगरवाल
यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केलीय. विशाल अगरवाल हे पुण्यातील ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचे प्रमुख आहेत. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अगरवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.  त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहित असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दलही त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अगरवाल हे नॉट रीचेबल झाले होते अखेर त्यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केलीये

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.