Kisan Sabha Long March : किसान सभेचा लाँग मार्च (Kisan Sabha Long March) ठाणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. काल (15 मार्च) राज्य सरकारचे प्रतिनिधी मंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे यांची अखिल भारतीय किसान सभेच्या (All India Kisan Sabha) नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत बऱ्याच विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान, आज (16 मार्च) दुपारी तीन वाजता किसान सभेच्या नेत्यांना मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत मंत्रालयात होणार आहे.  


दरम्यान, आमचे समाधान झाले तर मार्च थांबवू अन्यथा मोर्चा सुरुच राहणार असल्याची भूमिका किसान सभेच्या नेत्यांनी घेतली आहे. सध्या किसान सभेचा लॉंग मार्च कलंब गावात मुक्कामी आहे. आज तिथून पुढे मोर्चा सुरु राहणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मोर्चा सुरु राहणार आहे. वन जमिनीचा प्रश्न महत्वाचा आहे. आज त्यावर मंत्र्यांसोबत चर्चा झाली नाही. कुठल्या पातळीवर कोणता निर्णय होतो त्यावर बरेच काही अवलंबून असल्याची माहिती किसान सभेच्या नेत्यांनी दिली.


चर्चा सकारात्मक : जीवा पांडू गावित 


किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत मंत्र्यांनी जवळपास दोन तास चर्चा केली. बैठक संपल्यानंतर माकपचे नेते आणि माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी ही चर्चा सकारात्मक झाली असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. आज दुपारी तीन वाजता मंत्र्यांनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. ही बैठक मंत्रालयात पार पडणार आहे. चर्चेच्या दरम्यान मागण्यांशी संबंधित मंत्र्यांनीदेखील उपस्थित राहावे अशी अपेक्षा किसान सभेने व्यक्त केली आहे. आजच्या चर्चेत जवळपास 40 टक्के उत्तरे मिळाली आहेत. तर, उर्वरित मुद्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. सरकारसोबत चर्चा सुरु असताना किसान सभेचा लाँग मार्च हा सुरुच राहणार असल्याची माहिती गावित यांनी दिली.


चार दिवसांपासून मोर्चा सुरु


गेल्या चार दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नाशिकपासून लाँग मार्च काढला आहे. नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांनी लाँग मार्च निघाला तेव्हा किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. मात्र, त्यावेळी मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने लाँग मार्चने मुंबईच्या दिशेने कूच केली. मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार होती. मात्र, ही बैठक रद्द झाली. त्यानंतर काल हा मोर्चा ठाणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. शहापूरमधील कलंब गावात लाँग मार्च दाखल झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Long March : कांदा रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध, पायी लाँग मार्च नाशिकमधून मुंबईकडे रवाना