मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्या ठिकाणी निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणताही वाद घालू नये, कोणताही दावा करु नये असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. तसेच दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा मंत्र्यांची एक समिती तयार करावी आणि सीमावादावर चर्चा करावी असेही निर्देश त्यांनी दिले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावर आज दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत अमित शाह यांची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. 


कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमाप्रश्न पुन्हा एकदा तापला. त्यानंतर या वादावर चर्चा करण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीला बोलवलं होतं. त्यांच्यामध्ये जवळपास 25 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले याची माहिती अमित शाह यांनी दिली. 


Amit Shah On Maharashtra Karnataka Border Dispute: काय म्हणाले अमित शाह? 



  • दोन्ही राज्यांतील वाद मिटवण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे

  • हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यामुळे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत दोन्ही राज्ये यावर कोणताही वाद घालणार नाहीत, दावा करणार नाहीत.

  • दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री एकत्रित बसतील आणि यावर चर्चा करतील. त्यासाठी दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी तीन, अशा सहा मंत्र्यांची एक समिती तयार करण्यात येईल. लहानसहान वादग्रस्त मुद्द्यांवर ही समिती चर्चा करेल.

  • दोन्ही राज्यातील व्यापारी, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, सीमाभागात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी एका सिनियर आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. 

  • दोन्ही राज्यांतील विरोधी पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवावा, राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर करु नये. 

  • ट्विटरवरुन ज्यांनी या वादाला खतपाणी घातलंय, त्यांचा शोध घेण्यात येईल, या प्रकरणातील फेक ट्विटर अकाउंटचा शोध घेण्यात येईल आणि त्यावर कारवाई करण्यात येईल. 


 Karnataka CM Basavaraj Bommai: ते ट्विटर हॅंडल माझं नाही, बसवराज बोम्मई यांची माहिती 


कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावाने एका फिरणाऱ्या ट्वीटवर महाराष्ट्रासंबंधी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं. हा मुद्दा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावर ते अकाउंट आपलं नव्हतं अशी माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली. तसेच यासंबंधी तपास करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले.