Maharashtra Jalna News : राज्यसह (Maharashtra News) देशभरात दिवाळी सण (Diwali 2022) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. तर याचवेळी राजकीय नेत्यांची घरी देखील दिवाळी मोठ्या आनंदात साजरी होत आहे. दरम्यान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जालना (Jalna) येथील निवासस्थानी देखील दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी झाली. मात्र याचवेळी दानवे यांनी नेहमीप्रमाणे राजकीय फटकेबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रॉकेट तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणजे, अॅटम बॉम्ब असल्याचं दानवे म्हणाले. तर उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना म्हणजे फुसका फटाका असा टोलाही दानवेंनी लगावला. 


दरवर्षीप्रमाणे रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर भाऊबीज निमित्ताने त्यांच्या बहिणीने दानवे यांना औक्षण करून भावांच्या दीर्घ आयुष्यासाठी व त्याला सुख, शांती आणि समृद्धीची भरभराट लाभो यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. त्यानंतर एबीपी माझासोबत बोलताना दानवे यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. राजकीय नेत्यांना फटाक्यांची उपमा देत कुणाला रॉकेट तर कुणाला बॉम्ब आणि फुसका फटका अशा उपमा दिल्या. 


पाहा व्हिडीओ : रावसाहेब दानवेंनी साजरी केली भाऊबीज, राजकीय मंडळींना फटाक्यांची उपमा



कोणाला कोणती उपमा?


यावेळी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे रॉकेट नेते असून, एटम बॉम्ब देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे रॉकेट आणि एटम बॉम्ब फक्त आमच्याजवळ  आहे. लवंगी फटाके खूप झाले आता, प्रत्येक पक्षात असे लवंगी फटाके झाले आहेत. तर फटाक्यांची लड म्हणजे मनसे असून, एकदा फुटायला लागली की थांबतच नाही. पण लडमधील फटका फुटतो पण फायदा काही होत नाही. फक्त आवाज येतो. तर आवाज देणारा खाकी फटका म्हणजे आपल्या राज्यात शरद पवार यांना म्हणता येईल. तसेच उध्दव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे फुसका फटका असल्याचं दानवे म्हणाले.


अडीच वर्षात एकदाही आवाज नाही...


उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा फुसका फटका उल्लेख करतांना दानवे म्हणाले की, अडीच वर्षात एकदाही आवाज केला नाही. आता आमचं सरकार आलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले. अडीच वर्षे या राज्याचे वाया गेले. त्यामुळे ज्या सरकारने राज्याच्या जनतेचे अडीच वर्षे वाया घातले त्यांना फुसका फटका म्हणता येईल असे दानवे म्हणाले.