Maharashtra Government Formation : महाराष्ट्रातील राजकीय संघर्षाचा पेच (Maharashtra Political Crisis) अद्यापही सुरुच आहे. शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) कोसळंल. काल (गुरुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याची घोषणा केली. राज्यात अडीच वर्ष सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता राज्यात नव्या सत्ता स्थापनेच्या हालचालींनी वेग धरला आहे. या सर्व घडामोडींमध्ये मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (RajThackeray) यांचं ट्वीट चर्चेचा विषय ठरतंय. राज ठाकरेंनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट केलं आहे. राज ठाकरेंचं हे ट्वीट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उद्देशून असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. 


राज ठाकरेंनी एक ट्वीट केलं आहे की, "एखादा माणूस ज्या दिवशी आपल्याच नशिबालाच स्वतःचं कर्तव्य समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो." सत्तांतरानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला असून ट्विटरच्या माध्यमातून राज यांनी उद्धव यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 



राज ठाकरेंविरोधात द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबाबत तिळमात्र सहानुभूती नाही, मनसेची भूमिका


राज्यातील सत्तासंघर्षाला नवं वळण लागलं आहे. काल (गुरुवारी) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे राज्यात आता भाजपचं सरकार येणार हे निश्चित झालं. एकनाथ शिंदे आणि काही आमदारांच्या गटानं केलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आणि अखेर ठाकरेंना आपल्या मुख्यमंत्री पदाचा त्याग करावा लागला. उद्धव ठाकरेंनी काल जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला आणि मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचं जाहीर केलं. एवढंच नाहीतर त्यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता मनसेची प्रतिक्रिया समोर आली आहे.


उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हा मनसे महाराष्ट्र सैनिकांना तिळमात्रही सहानुभूती नाही, अशी भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. राज ठाकरेंच्या विरोधात नेहमीच द्वेषाचं राजकारण करणाऱ्या आणि प्रत्येक बाबतीत राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला अजिबातच सहानुभूती नाही, अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. 


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि गेली दोन वर्षे सात महिने सत्तेवर असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. आणि आता नव्या सरकारच्या स्थापनेची तयारी सुरु झालीय. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विधिमंडळात बहुमत चाचणी करण्याचे आदेश राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले. त्याला सुप्रीम कोर्टातही आव्हान देण्यात आलं. पण कोर्टानं आजच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानं  उद्धव ठाकरे त्याआधीच राजीनामा देऊन मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. मुख्यमंत्रिपदाबरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा त्यांनी दिला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आज गोव्यातून मुंबईत येण्याची शक्यता आहे.