Maharashtra Government Formation : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सर्व सामान्य जनतेपासून राजकीय लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( Dr.Amol Kolhe )यांनीही सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. एवढं जे महाभारत घडलं त्यात नेमकं“कोण” जिंकलं??, असा सवाल अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर उपस्थित केलाय. 


एवढं जे महाभारत घडलं त्यात नेमकं“कोण” जिंकलं??, अशा आशयाची कविताच अमोल कोल्हे यांनी सोशलवर शेअर केली आहे. ते म्हणतात... खुर्ची तीच पाय तेच, फक्त वरचं बूड बदललं. हुजरे तेच मुजरे तेच, फक्त समोरचं धूड बदललं.. असे म्हणत अमोल कोल्हे यांनी सत्तानाट्यावर कविता सादर केली आहे.






अमोल कोल्हे यांची कविता - 
खुर्ची तीच पाय तेच
फक्त वरचं बूड बदललं
हुजरे तेच मुजरे तेच
फक्त समोरचं धूड बदललं
फायली त्याच प्रस्ताव तेच
फक्त सहीचं पेन बदललं
बोट तेच शाई तीच
फक्त दाबलेलं बटन बदललं
माणसं तीच, भाषा तीच
फक्त आतलं मन बदललं
आरोप तेच प्रकरणं तीच
फक्त वातावरण बदललं
पराभूतानं मन जिंकलं
विजेत्यानं सत्व गमावलं
मतदारांनी लोकशाहीला अन्
लोकशाहीनं न्यायपालिकेला पुसलं
एवढं जे महाभारत घडलं 
त्यात नेमकं “कोण” जिंकलं??
#MaharashtraPolitics


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज रात्री सात वाजता शपथ घेणार आहेत.