मुंबई: राज्यातील शेतकरी आजपासून पुन्हा 10 दिवस संपावर जात आहेत. राष्ट्रीय किसान महासंघानं केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातले शेतकरी आजपासून 10 जूनपर्यंत संपावर असतील.


या 10 दिवसांच्या काळात शेतकरी आपला कोणताही माल विक्रीसाठी काढणार नाही. ठिकठिकाणी दूध-भाजांच्या गाड्या अडवण्यासा सुरुवात झाली आहे.

खेड-शिवापूर टोलनाक्यावर हजारो लीटर दूध रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध केला. यावेळी राष्ट्रीय किसान महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी संपाचा भाग म्हणून दुधाच्या टँकरमधून दूध सोडून दिलं. रात्री अडीचच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावर हा प्रकार घडला. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर दुधाची नदी वाहत असल्याचं चित्र दिसलं.

पुण्यातील आंबेगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, परभणी, लातूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

दुसरीकडे गेल्या वर्षी नगर जिल्ह्यातील पुणतांब्यातून सुरुवात झालेल्या शेतकरी आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे.

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीही संप केला होता. त्यावेळी त्यांनी विविध मागण्या केल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा,   शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा आणि  शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, या मागण्यांचा समावेश होता.

कुठे कुठे आंदोलन?

-        पुणे – आंबेगावमध्ये टाळकुटी आंदोलन केलं जाणार आहे.

-        कोल्हापूर – किसान महासभेचा भव्य मोर्चा निघणार आहे, सकाळी 11 वाजता.

-        सांगली – किसान सभेच्या वतीने देवस्थान ईनाम जमीन, हमीभाव, दूध दर, जमीन अधिग्रहण, कर्जमाफी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणार- सकाळी 11 वाजता.

-        सोलापूर - शेतकरी किसान सभा आणि सुकाणू समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन, सकाळी 11 वाजता.

-        नाशिक – किसन सभा निदर्शन करणार -  सकाळी 11 वाजता.

-        जळगाव – किसान महासंघ आणि शेतकरी कृती समिती तर्फे आज चोपडा येथे शासनाच्या विरोधात निदर्शने, दुपारी 12 वाजता.

-        परभणी – किसान महासभेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव - सकाळी 11 वाजता.

-        लातूर – खलग्री यागावातील शेतकरी संपावर जाणार आहेत. गावातील दूध, भाजी आणि धान्य हे गावाबाहेर जाणार नाहीत असा ठराव करण्यात आला आहे. तसेच रेणापूर फाटा येथे रास्तारोको करण्यात येणार आहे. या गावाचे उपसरपंच आणि शेतकरी गजानन बोळंगे यांनी आत्मदाहनाचा इशारा दिला आहे.