उस्मानाबाद : ज्या भागाला पावसाची तीव्र गरज होती. त्या मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागात कालपासून चांगला पाऊस होत आहे. लातूर, उस्मानाबाद, तुळजापूर बीड, नांदेडमध्ये काल रात्रभर पाऊस सुरु राहिला. तर परभणी,जालना,औरंगाबाद, हिंगोली इथंही पावसानं हजेरी लावली. मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, महाबळेश्वर परिसरातही रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे.


मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी

लातूर जिल्ह्यात काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून पावसाच्या हलक्या सरी बरसायलाला सुरुवात झाली. लातूर शहर आणि परिसर औसा, उदगीर, औरंद, शाहजानी, रेणापूर, जळकोटसह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. याशिवाय, उस्मानाबाद, तुळजापूर, परांडा आदी भागातही काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु आहे.

गेल्या 50 दिवसांपासून पावसाने ओढ धरल्यामुळे काल संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याने, बळीराजाला दिलासा मिळाला आहे. कारण पुढील रब्बी हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही बऱ्याच अंशी मिटणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरु

दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि कोयना परिसरात पाऊसाचं पुनरागमन झालं आहे. कालपासून तुरळक पडत असलेल्या सरींचा जोर रात्रीपासूनच वाढला आहे. काल रात्रभर बरसलेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात एक टीएमसीने वाढ झाली आहे. सोलापुरातही पावसाची रिपरिप सुरु आहे.

तर सांगली परिसरातही पावसाची संततधार सुरु आहे.

दरम्यान, येत्या चार दिवसात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार पावसानं कमबॅक केल्यानं हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरल्याचं मानलं जात आहे.

दुसरीकडे हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास त्यांच्या तोंडात बारामतीची साखर भरविन, असा चिमटा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काढला होता. त्यामुळे आता शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर सर्वांचं लक्ष आहे.

संबंधित बातम्या

...तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन : शरद पवार

राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज