मुंबई : राज्यात आज गेल्या 74 दिवसांतील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. राज्यात आज 15 हजार 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 33 हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता राज्याचा रिकव्हरी रेट 93.88 टक्क्यांवर पोहचला आहे. 14 मार्च रोजी राज्यात 15051 रुग्णांची नोंद झाली होती. 


दरम्यान आज 184 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के आहे. राज्यात सध्या 2 लाख 53 हजार 367 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 53 लाख 95 हजार 892 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 95 हजार 344 रुग्णांना आतापर्यंत जीव गमावला आहे. 


मुंबई, पुण्यातही रुग्णसंख्या घटली


मुंबई पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. मुंबईत आज 676 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5570 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 6,66,796 रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत 22 हजार 390 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पुण्यात गेल्या 24 तासात केवळ 180 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात एकूण 4439 चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर गेल्या 24 तासात 751 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण 33 जणांचा मृत्यू झाला असून सध्या पुणे शहरात 6020 अक्टिव्ह रुग्ण आहेत. 


Maharashtra Lockdown Relaxation : राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात लॅाकडाऊन शिथील? काय सुरु, काय बंद?


मुंबई-पुण्यात उद्यापासून निर्बंध शिथील


मुंबईमध्ये सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सर्व अत्यावश्यक आणि बिगर अत्यावश्यक दुकाने सुरु राहतील. दुकाने सुरु करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर दुसऱ्या बाजूची दुकाने मंगळवार आणि गुरुवार अशी सुरु राहतील. तर शनिवार रविवार आवश्यकतेनुसार दुकाने बंद राहतील. 


तर पुण्यात सोमवार ते शुक्रवार  सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकानं सुरू राहणार. शनिवारी आणि रविवारी सकाळी सात ते दोन या कालावधीत फक्त आत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहणार. बाकी दुकाने बंद राहणार आहेत. पीएमटी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र बंद राहणार आहे.