मुंबई : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आज राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आज 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 4347592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.  यामुळं  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.3% एवढे झाले आहे.


आज राज्यात 53605 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे तर राज्यात आज 864 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राने आज 75 हजार मृत्यूचा आकडा पार केला. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९१,९४,३३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५०,५३,३३६ (१७.३१ टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.  सध्या राज्यात ३७,५०,५०२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज एकूण ६,२८,२१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  


राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय येत्या 15 तारखेला


राज्यातील अनेक जिल्ह्यांत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय येत्या 15 तारखेला घेणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळं त्या राज्यात कडक लॉकडाऊन लावणार असून राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट अजून कमी होत नाही. दररोज 50 ते 60 हजारांच्या घरात रुग्ण संख्या येत आहे. त्यामुळं एक तृतीअंश राज्य हे उतरत्या वळणार असून उर्वरित भागावर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी माहिती टोपे यांनी दिली.


अनेक जिल्ह्यांमध्ये संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा


राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळं काही जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यामध्ये संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.  जास्त रूग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांत कडकडीत लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असं मत हायकोर्टानं देखील व्यक्त केलं होतं. आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मेडिकल आणि आरोग्य सुविधांशी संबंधित कामं वगळता सर्व गोष्टींवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.