उस्मानाबाद :  राज्यात कोरोनाचा प्रकोप झालेला असताना कोरोना बाधितांवर उपचारांमध्ये सुद्धा जिसकी लाठी उसकी भैंस अशी स्थिती आहे. सत्ताधारी पक्षातले मंत्रीच स्वतःच्या मतदारसंघासाठी अधिक औषधं, इंजेक्शन, ऑक्सिजनचा पुरवठा करून घेऊ लागलेत. कोरोना बाधितांवर उपचारासाठी जणू संजीवनी प्रमाणे वापर होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राजेश टोपे यांच्या सासरवाडीत म्हणजे उस्मानाबादमध्ये तुटवडा आहे. चढ्या किमतीत सुद्धा इंजेक्शन विकत मिळत नाही. अशातच आता असमान वितरणाचा एक मोठा प्रकार समोर आला आहे. आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यात तब्बल दहा हजार इंजेक्शन उपलब्ध केल्याची घोषणा खुद्द राजेश टोपे यांनी केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये स्वहस्ते खासगी रुग्णालयाच्या खाजगी मेडिकल शॉपच्या माध्यमातून त्याचा पुरवठा सुद्धा केला. महत्वाचं म्हणजे त्याचे स्वतः ट्वीट करून ते जाहीर करून सांगितलं. 


दुसरीकडे राजेश टोपे यांच्या सासरवाडीत त्या काळात एकही इंजेक्शन शिल्लक नव्हतं. जो प्रकार इंजेक्शनचा बाबतीत तोच प्रकार ऑक्सिजनच्या बाबतीत ते 13 एप्रिल रोजी शासनाने पुरवठा केलेल्या ऑक्सिजनची आकडेवारी बघितली तर मराठवाड्यात सक्रिय रुग्णसंख्या 64 हजार 175 इतकी आहे. त्यांच्यासाठी 151 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे विभागात मराठवाड्याच्या दुप्पट म्हणजेच दोन लाख 32 हजार 900 रुग्णसंख्या असताना तिथं 578 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात येथील गरज ही 294 मेट्रिक टन दिसते.


बंदी घातलेल्या निर्यातदारांकडून कायदेशीररित्या रेमडेसिवीर खरेदीबाबत चर्चा सुरु, राजेश टोपेंची माहिती


बरं राजेश टोपे हे एकटेच असे नेते नाहीत. राज्याचा प्रत्येक नेता आपल्या मतदारसंघापुरतं पाहतोय असं दिसतंय. राजेश टोपेंनी जालन्यात इंजेक्शन दिली. गडकरींनी तर रेमडेसिवीरसाठी थेट दोन कंपनीच्या मालकांना फोन करुन नागपूरसाठी मोठा सप्लाय निश्चित केला. खासदार हेमंत गोडसेंनी नाशिकसाठी तर अमित देशमुखांनी लातूरची जबाबदारी घेतली. असं असेल तर ज्या जिल्ह्याचा मंत्री नाही त्यांनी काय करायचं? असा सवाल उपस्थित होत आहे. 


राज्यात रेमडिसवीर इंजेक्शनचा तुटवडा झाला आहे. 1 मार्च या दिवशी राज्यात 3  लाख व्हायल्स शिल्लक होत्या. त्या वेळी रोजची 15 हजार इजेक्शनची गरज होती. त्यामुळे कंपन्यांनी नव्या बॅच टाकल्या नाहीत. आता नव्या बॅच टाकल्या गेल्यात. पण त्याचे उत्पादन प्रत्यक्षात बाजारात यायला 20 एप्रिल उजाडणार आहे. अशी परिस्थिती असल्याने रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. प्रत्येक इंजेक्शन महत्वाचे ठरत आहे. अनेक जिल्हा रुग्णालयातून रेमडेसिवीर मिळेनासे झाले आहे.