मुंबई : राज्यात आज 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज 26 जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण 132 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 11 हजार 492 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. 


आजपासून 18 ते 44  वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला 26 जिल्ह्यांमध्ये  सुरुवात झाली. उर्वरीत जिल्ह्यांमध्ये उद्या 2 मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे 3 लाख डोसेस खरेदी केले आहेत.


या वयोगटासाठी आज सर्वाधिक लसीकरण पुण्यात झालं. पुण्यात 19 केंद्रांवर 1316 जणांचं लसीकरण झालं. तर मुंबईतील पाच केंद्रांवर 1004 जणांचं लसीकरण झालं. 


राज्यातील अनेक लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम, लसीचा साठाच नसल्याने नियोजन कोलमडले


राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास राज्य शासन तयार असून यासाठी लागणारी सर्व रक्कम एका चेकद्वारे देऊन लस विकत घेण्याचीही तयारी आहे. परंतु लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लगेच 1 मे पासून लस केंद्रांवर गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्य शासनाने ही लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात या वयोगटात 6 कोटी नागरिक आहेत, त्यांना प्रत्येकी 2 डोस म्हटले तरी 12 कोटी लसींची आवश्यकता आहे. आपण दररोज 10 लाख लोकांचे लसीकरण करु शकतो एवढी महाराष्ट्रात क्षमता आहे. परंतु लस वितरण हे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरप्रमाणे केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे.


Corona Vaccination: लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात, लसीचा साठाच नसल्याने अनेक राज्यांची लसीकरण करण्यास असमर्थता


राज्यात 18 ते 45 वयोगटातील सर्वांना लस देण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने कमी प्रमाणात लस वाटप करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक  ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं असून सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं दिसून आलं आहे.