मुंबई  : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात आज 8,085 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 623 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 58 लाख 9 हजार 548 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 098 अॅक्टिव रुग्ण आहेत. 


राज्यात आज 231 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 13 लाख  98 हजार 501 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 51 हजार 633 (14.62 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 21 हजार 836 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3 हजार 584 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांपैकी यवतमाळमध्ये सर्वात कमी 89 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 16 हजार 467 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एकूण 35 जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात एकही मृत्यूची नोंद नाही. तर नांदेड जिल्हात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. 


मुंबई आज 562 रुग्णांची नोंद, तर 12 रुग्णांचा मृत्यू


मुंबईत गेल्या 24 तासात 562 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 629 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 95 हजार 425 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8371 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 721 दिवसांवर गेला आहे. 


 देशात 102 दिवसांनी 40 हजारांहून कमी रुग्णांची नोंद


 देशात काल  24 तासांत 37,566 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 907 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 102 दिवसांनी देशात चाळीस हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल दिवसभरात 56,994 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याचसोबतच देशाचा रिकव्हरी रेट 96.87% वर पोहोचला आहे.  देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होऊन  5,52,659 पोहोचली आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 3,97,637 रुग्णांचा मृत्यू झाला आहे