मुंबई : राज्यात जून  महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे.  मंगळवारी राज्यात 2956  रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 1724  रुग्ण हे मुंबईतील आहे आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब  आहे.


मुंबईकरांची चिंता वाढली


आज राज्यात 2956 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 2165 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 1724  रुग्णांची नोंद झाली आहे.  राज्यात आज कोरोनाच्या चार  मृत्यूची नोंद झाली आहे. 


आज चार कोरोना मृत्यूची नोंद


राज्यात आज एकूण 2156 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,49, 276  जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.9 0टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला आहे. 


सक्रिय रुग्णसंख्या वाढली


राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 18267 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 11813 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 3403 इतके सक्रिय रुग्ण आहेत. 


राज्यात बी ए.5 व्हेरीयंटचे आणखी दोन रुग्ण ठाण्यात आढळले
 
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार राज्यात बीए. 5 व्हेरियंटचे आणखी दोन रुग्ण ठाणे शहरात आढळून आले आहेत. या पैकी एक रुग्ण 25 वर्षांची महिला तर दुसरा रुग्ण 32 वर्षांचा पुरुष आहे. हे दोन्ही रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले. या दोन्ही रुग्णांचे लसीकरण झालेले आहे.


कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट


गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6594 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट दिसून आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी दिवसभरात 6594 रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासांत 4035 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 50 हजार 548 पर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी दैनंदिन सकारात्मकता दर मागील दिवसाच्या तुलनेत 2.05 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.