मुंबई :  राज्यातील कोरोनाच्या (Coronvirus) रुग्णसंख्येत काहीसा चढ-उतार दिसून येत आहे. राज्यात आज  129 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 121 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यात शून्य कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 


राज्यात आज शून्य कोरोनाबाधितांचा मृत्यू


राज्यात आज शून्य कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 77,31,588 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे. 


राज्यात आज 1526 सक्रिय रुग्ण


राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येची संख्या ही 1526 इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे 896 सक्रिय रुग्ण हे मुंबईत  असून त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतोय. पुण्यामध्ये सध्या 307  इतके सक्रिय रुग्ण आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत 8,05,72,867 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.


देशातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट


 देशातील कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 202 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी 2 हजार 487 नवीन कोरोना रुग्ण आणि 13 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत भारतात पाच लाखहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाची नवी आकडेवारी जारी केली आहे. गेल्या 24 तासांत 2 हजार 550 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. यासह देशाता आतापर्यंत कोरोना संसर्गावर मात केलेल्यांची संख्या 4 कोटा 25 लाख 82 हजार 243 वर पोहोचली आहे. तसेच नव्या 27 कोरोनाबळींसह मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 5 लाख 24 हजार 241 इतकी झाला आहे. देशात सध्या 17 हजार 317 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.