मुंबई : राज्यात आज 6005 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 10 हजार 124 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे. 


राज्यात आज कोरोनामुळे 177 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 31 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 74  हजार 318 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (64), अमरावती (87) वाशिम (77), गोंदिया (96), गडचिरोली (22)   या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 552 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


नंदूरबार, हिंगोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,85,32,523 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,21,068 (13.02 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,51,971 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,009 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 288 कोरोना बाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 288 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 412 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,12,723 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबई तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4616 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1555 दिवसांवर गेला आहे. 


देशात गेल्या 24 तासांत 30,549 कोरोनाबाधितांची नोंद


केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,549 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून 422 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. केरळमध्ये काल दिवसभरात 13,984 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, काल दिवसभरात देशभरातून 38,887 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात गेल्या सहा दिवसांपासून सलग 40 हजारांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद केली जात होती.