मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. आज  9 हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 756 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.  राज्यात आतापर्यंत 59 लाख 80 हजार 350 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.24 टक्के आहे. 


राज्यात आज 180 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 31 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  1 लाख 3 हजार 486 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (39), हिंगोली (67), यवतमाळ (23), गोंदिया (68), चंद्रपूर (45)  या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 414 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


भिवंडी, नांदेड, भंडारा,  जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 2052 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,54,81,252 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,14, 190 (13.66 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,67,585व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,066 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 454 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे.   मुंबईत गेल्या 24 तासात 453 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 512 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,06,552 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,544 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1001 दिवसांवर गेला आहे. 


काल 41,157 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 518 कोरोना रुग्णांचा मृत्यू


 काल 41,157 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसेच 518 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. यापूर्वी शनिवारी 38,079 आणि शुक्रवारी 38,949 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. गेल्या 24 तासांत 42,004 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.