मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 997 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1016  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 64  हजार 948 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे. 
 
राज्यात आज 28  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 12 हजार 352  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,10,264 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 876  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 36 , 30, 632 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


 देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 11,466 दैनंदिन रुग्णांची नोंद


 भारतात एका दिवसांत कोरोनाच्या 11 हजार 466 दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या वाढून बुधवारी तीन कोटी 43 लाख 88 हजार 579 वर पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 1 लाख 39 हजार 683 वर पोहोचली आहे. जी 264 दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे. जाणून घेऊया देशातील कोरोनाची एकूण परिस्थिती...  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळं 460 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 4,61,849 वर पोहोचला आहे. देशात सलग 33 दिवसांपासून कोरोनाच्या 20 हजारांहून कमी सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. तर 136 दिवसांपासून 50 हजार सक्रिय रुग्णांची नोंद केली जात आहे. 


Mumbai Corona Vaccine : मुंबईने गाठला दीड कोटी लसीकरणाचा टप्पा


राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरत आहे.  करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू आहे. तर, दुसरीकडे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण देखील जोरात सुरू असल्याचं दिसून येत आहे. आज मुंबईने दीड कोटीचा टप्पा गाठला आहे. कोविड-19 प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत मुंबई महानगरामध्ये पहिली आणि दुसरी लशीची मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याची कामगिरी आज  अखेर साध्य करण्यात आली आहे.