CM Eknath Shinde : राज्याच्या अर्थसंकल्पातून मांडलेलं विकासाचं पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करु. समाजातील सर्व घटकांना न्याय देतानाच सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून राज्याला गती देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी दिली. तसेच मुंबईचे (Mumbai) गतवैभव पुन्हा मिळवून देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली. त्यापूर्वी विधानसभेत मुख्यमंत्री बोलत होते. अंतिम आठवडा प्रस्ताव नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.


सर्वसमावेशक विकासाची संकल्पना


सर्वसामान्यांचे सरकार स्थापन होऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत. पूर्ण काळ अधिवेशनं घेऊन विक्रमी कामकाज केले आहे. लोकशाहीत चर्चा, संवादाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सुटू शकतात. पंचामृताच्या योजनांतून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वसमावेशक विकासाची संकल्पना घेऊन आम्ही काम करत आहोत. आमच्या सरकारनं पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्य, सामाजिक न्याय, महिला, आदिवासी विकास, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आमची विकासाची संकल्पना, प्रगतीचा विचार हा सर्वसमावेशक असून आमचे सरकार महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील 12 कोटींपेक्षा अधिक जनता आशावादी आहे. 


सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा 


राज्यातील बळीराजावर संकट आले असून बळीराजाच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. अडचणीच्या काळात मदतीसाठी मागेपुढे बघणारे आम्ही नाही. त्यामुळेच कांदा उत्पादकांपासून अवकाळीग्रस्तांपर्यंत सगळ्यांना या सरकारवर विश्वास आहे. सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.


राज्यात विकासाची बुलेट ट्रेन सुसाट 


लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे सरकार अशी ओळख धडाकेबाज निर्णयांमुळेच मिळाली आहे. डबल इंजिनमुळं या राज्यात विकासाचा वेग वाढला आहे. विकासाची बुलेट ट्रेन सुसाट निघाली आहे. केंद्राने महाराष्ट्रासाठी विविध योजनांसाठी निधी देखील मोठ्या प्रमाणावर दिला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  सुमारे 32 हजार 780 कोटी केंद्र शासनाने महाराष्ट्राला दिले आहे. मुंबईतला एमटीएचएल प्रकल्प असो, किंवा कोस्टल रोड, मेट्रोची कामं, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण अशा विविध पायाभूत सुविधांच्या कामांनी वेग पकडला आहे. मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन वर्षाअखेरीस होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


समृद्धी महामार्ग अधिक सुरक्षित करण्याचे नियोजन


भारतासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती दिली असून बीकेसीमध्ये जागा उपलब्ध करुन दिली आहे. भारतातील या सर्वात पहिल्या बुलेट ट्रेनची सुरुवातही करु असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई-नागपूर  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महाराष्ट्र महामार्ग अधिक सुरक्षित करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 


मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार 


गेल्या काही वर्षात मुंबईचा रखडलेला विकास आणि खड्ड्यांची मुंबई ही ओळख पुसून मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचे आहे. बाहेर गेलेला मुंबईकर परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि यापुढेही राहील. मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकासाचा मार्गही मोकळा केल्यामुळं सेस बिल्डिंगमधील रहिवाशांना आता चांगली आणि हक्काची घरं मिळणार आहेत. मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी बांधवांनाही त्यांचे कोळीवाडे आणि स्वतंत्र गावठाण यांचे सर्वेक्षण आणि सीमांकन करून हक्काची घरं मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


मुंबई, मुंबई महानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती


मुंबईसारख्या महानगरामध्ये दळणवळणानंतर घरांचा विषयही जिव्हाळ्याचा आहे. आमचं सरकार आल्यानंतर केवळ मुंबईच नाही तर मुंबई महानगर क्षेत्रात देखील सिडको, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती करत आहोत. आजच्या पिढीला, तरुणांना काम करणारे सरकार हवे आहे, आणि आम्ही ‘परफॉर्म’ करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Budget Session : विधानपरिषदेचे 125 तास तर विधानसभेचे 165 तास कामकाम; दोन्ही सभागृहात 17 विधेयके संमत