Gopichand Padalkar on Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची जीभ घसरली आहे. पडळकरांनी अजित पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरली आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर ते स्वराज्य रक्षक होते, असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना पडळकर म्हणाले की, असं म्हणणाऱ्यांची कदाचीत सुंता झाली असती. प्रसारमाध्यमांच्या मित्रांनी जाऊन खरी परिस्थिती काय आहे हे तपासावं असं पडळकरांनी म्हटलं आहे. 


विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर ते स्वराज्य रक्षक होते. अजित पवारांच्या या वक्तव्यावर भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर हा वाद आता काहीसा शमला होता. अशातच पडळकरांनी अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली आहे. त्यामुळं पुन्हा यावरुन वादंग उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


नेमकं काय म्हणाले गोपीचंद पडळकर?


संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असं म्हणणाऱ्यांची कदाचित सुंता झाली असती. त्यांना जर तसं वाटत असेल तर प्रसारमाध्यमांच्या मित्रांना माझी विनंती आहे की, त्यांनी तिथे जाऊन खरी परिस्थिती काय आहे हे तपासावं. संभाजी महाराज धर्मवीर नसते तर अशी परिस्थिती झाली असती की नसती? हे मला सांगा, असा सवालही गोपीचंद पडळकरांनी विचारला.


पाहा व्हिडीओ : Gopichand Padalkar :Chhatrapati Sambhaji Maharaj यांना धर्मवीर न मानणाऱ्यांची कदाचित सुंता झाली असती



देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ गोपीचंद पडळकर यांना समज द्यावी : सचिन खरात


भाजप आमदार गोपीचंद पडळकर सतत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर चुकीच्या भाषेमध्ये टीका करत असतात. हे अत्यंत चुकीचे असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य हे रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे. तरीसुद्धा राज्यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या भाषेचा वापर केला आहे. ही राज्याला न शोभणारी भाषा आहे. त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना समज द्यावी अशी विनंती आपणास करत असल्याचे सचिन खरात यांनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या:


'काही दिवसात जयंत पाटलांच्या घरासह बारामती-मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा असेल' : गोपीचंद पडळकर