Maharashtra Bandh :   उत्तरप्रदेशातील लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यात महाविकास आघाडीतील पक्षांकडून बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला राज्यभरात अनेक ठिकाणी प्रतिसाद मिळतोय तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद आहे. या बंद संदर्भात बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे ढोंगी सरकार आहे.  लखीमपूरसाठी बंद केला जातो पण राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत केली नाही.  भारतीय जनता पार्टीचं सरकार बरं होतं असे शेतकरी बोलत आहेत आताचं सरकार हे ढोंगीबाज आहे, असं ते म्हणाले. 


Maharashtra Bandh: 'शिवसेनेच्या मनात बंद करणं नव्हतं, खुर्ची टिकवायचीय तर पवारांचं ऐकावं लागतं', भाजपचा आरोप


फडणवीस म्हणाले की, हे तेच सरकार आहे ज्यांनी पाण्यासाठी मावळला शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता.  बंद जबरदस्तीने केला जातोय, हे बंद म्हणजे पोळी भाजण्याचं काम करत आहेत.  दमदाटी करून, प्रशासनाचा वापर, धमकी देऊन बंद केला आहे.  सरकार पुरस्कृत हा बंद आहे. कारण ईस्टर्न फ्री वे वर दहा कार्यकर्ते उपस्थित होते आणि पोलीस तमाशा पाहात होते, असं फडणवीस म्हणाले. 


महाविकास आघाडी सरकारने आज राज्यभर बंद पुकारला आहे.हा पुकारलेला बंद ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा हल्ला करत, आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याच सरकारने मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. गोळीबार करणाऱ्यांना आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का? असा सवाल करतानाच मावळमध्ये गोळीबार झाला तो जालियनवाला बाग होता, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. आजचा बंद संवेदना दाखवणारा नाही तर राजकीय पोळी भाजण्यासाठीचा आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद नाही. प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस, जीएसटी प्रशासनाचा वापर करून लोकांना बंद करायला भाग पाडलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.

 

महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपण समोर आला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे. लखीमपूरच्या घटने करता महाराष्ट्रात बंद केला जातो. पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही. शेतकरी संकटात आहे. हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन 25 हजाराच्या घोषणा केल्या, 50 हजाराच्या घोषणा केल्या, पण या सर्व घोषणा हवेत विरल्या. विविध आपत्तीत मदतच केली नाही. केली तरी तोकडी केली. त्यामुळे घटक पक्षच म्हणून लागले भाजपचं सरकार बरं होतं. हे सरकार मदत करत नाही त्यामुळे आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे, अस फडणवीस म्हणाले.






बंदला पोलीसांचा पाठिंबा 

 

सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई हायकोर्टाने बंद करण्यास मनाई केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने स्यूमोटो घेऊन अवमानना केल्याप्रकरणी या पूर्वी बंद पुकारला म्हणून शिवसेनेला दंड ठोठावला होता. सेनेने त्याची भरपाई भरली होती. त्यामुळे आजच्या बंदमध्ये जे काही नुकसान होईल, त्याची भरपाई ही सरकारकडून वसूल केली पाहिजे. कोर्टाने स्यूमोटोद्वारे या घटनेची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसंही या सरकारचं नाव बंद सराकर आहे. या सरकारने आल्यापासून योजना, अनुदानं बंद केल्या. कोरोना काळात महाराष्ट्र बंद केला. आता कुठे छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांचं गाडं रुळावर येत असताना सरकारने बंद पुकारला. ईस्टर्न एक्सप्रेसवर दहा लोकांनी जाळपोळ केली. त्यावेळी पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. धमक्या देऊन, दमदाटी करून बंद पुकारला जात आहे, असं ते यावेळी म्हणाले.देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा हल्ला चढवला.






बंद यशस्वी करण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न
महाराष्ट्रात सरकारपुरस्कृत बंद कधीच झाला नाही. महाराष्ट्र बंदसाठी सरकारी यंत्रणांकडून दबाव आणण्याचं काम मविआ नेते,पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे. लखीमपुर येथे झालेली घटना वाईट आहे त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो. संपूर्ण देश या घटनेचा निषेध व्यक्त करत आहे. परंतु केवळ राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडून लखीमपुरच्या घटनेचा वापर होत असल्याची टीका आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.  महाराष्ट्रातील आजचा बंद हा राज्य सरकार पुरस्कृत आहे. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी व्यापारी संघटनांना सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडूनच दमबाजी होत आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या सुरू राहणार असल्याचे आधी सांगण्यात आले पण तेथे सुध्दा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी दबाव टाकून त्या बंद केल्या. बाजार समित्या सरकारच्या अखत्यारीत येतात परंतु त्याही बंद करण्यात आल्या आहेत, त्यामुळे सर्व ठिकाणी केवळ दबाव तंत्राचा वापर करत बंद यशस्वी करण्याचा केविलवाणा प्रयत्न झाल्याची टिका दरेकर यांनी केली.


राज्य सरकारला शेतकऱ्यांबद्दल प्रेम नाही -चंद्रकांत पाटील 


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोल्हापुरात बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारला शेतकऱ्यांबद्दल प्रेम नाही, महाराष्ट्रात जी कारवाई सुरू आहे त्यावरून लक्ष वेधण्यासाठी हा बंद केला जातोय.  लखीमपूरमध्ये जी घटना घडली त्याला भाजपला का लेबल लावलं जातं आहे. मावळमध्ये तर पोलिसांनी शेतकऱ्यांना शोधून शोधून मारलं होतं. याठिकाणी एका व्यक्तीने ही घटना घडवली आहे. त्याची चौकशी करावी आणि कारवाई करावी.  शेतकऱ्यांनी देखील गाडीतील चार जणांना ठेचून ठेचून मारलं, असं पाटील म्हणाले. 


Maharashtra Bandh Live Updates : काही ठिकाणी कडकडीत बंद तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद


चंद्रकांत पाटील म्हणाले की, हा बंद म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचं काम आहे. खुर्ची टिकवायची तर शरद पवार यांचे ऐकावं लागतं.  म्हणून शिवसेना या बंद मध्ये उतरली आहे.  शिवसेनेच्या मनात हा बंद करणं नव्हतं, असंही ते म्हणाले.


पाटील म्हणाले की,  अजित पवार हे हुशार राजकारणी आहेत. अजित पवारांनी इंधन जीएसटीमध्ये येऊ दिलं नाही.  नाहीतर आता पेट्रोल डिझेल प्रतिलीटर 30 रुपयांनी कमी दरात मिळालं असतं. अजित पवार यांनी इंधन जीएसटीमध्ये आणावं उद्या दर कमी होईल, असं ते म्हणाले.