शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या मुद्यावरून आज विधान परिषदेमध्ये विरोधकांनी सभात्याग केला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा मुद्दा मांडला होता. त्यावर चर्चा न होता सत्ताधारी बाकावरील आमदाराने शेतकरी वीज चोरतात असा त्याचे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने विरोधकांनी सभात्याग केला.


विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडताना सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना वीज जोडण्या आणि बोगस बिलं पाठवल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरण कंपनीची परवड होते असून पैशांची चणचण आहे. केंद्र सरकारच्या नियमांमुळे पैसे उभारताना मर्यादा येत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यमंत्री उत्तर देत असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका जळगाव मधल्या शेतकऱ्याला वीज जोडणी दिली नसताना 73 हजार रुपये बिल दिले गेले असल्याचे म्हटले. त्याच वेळी सत्ताधारी बकावरून चोरून वीज घेतली जाते त्याचे काय असा प्रश्न उपस्थित झाला. याच वाक्यावरून विरोधक आक्रमक झाले. सत्ताधारी आमदाराने शेतकऱ्यांना चोर म्हणाले म्हणून गोंधळ घातला आणि सभात्याग केला. 


विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, आमचे सदस्य गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी वीज जोडणी तोडल्याबाबत लक्षवेधी आणली होती. त्याशिवाय वीज बिलातही अनेक चुका आहेत, असे आम्ही सांगितले. मात्र, त्यावर चर्चा न करता एका आमदाराने  शेतकरी चोऱ्या करतात त्याच काय असा सवाल या वेळी उपस्थित केला. शेतकऱ्यांना चोर म्हटल्याच्या निषेधार्थ सभात्याग केला असल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटले.


त्या आमदाराने माफी मागायला हवी 


ज्या आमदाराने मग तो कुठल्याही पक्षाचा असो तो जर शेतकऱ्याला चोर म्हणत असेल तर त्याने तात्काळ माफी मागायला हवी, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले. सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे त्यामुळे पुन्हा एकदा वीज बिल माफी करायला हवी असेही त्यांनी म्हटले. 


मी स्वतः वीज बिल माफी करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. आता देखील मी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे आणि तत्काळ वीज बिल माफीची मागणी करणार आहे असेही बच्चू कडू यांनी म्हटले.