पुणे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधे पडलेली फुट अधिकच मोठी होताना दिसतेय.  डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबीयांच्या समितीत सक्रिय होण्यास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट डॉक्टर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्या सोबत काम करतोय तर दुसरा गट अविनाश पाटील यांच्या सोबत काम करतोय. नुकतेच एन डी पाटील यांचे निधन झाल्यावर या दोन गटातील वाद पुन्हा उफाळून आलाय.  


एन डी पाटील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते.  त्यांच्या जागेवर एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांची निवड करण्याचा निर्णय हमीद आणि मुक्ता दाभोलकर  गटाने घेतला.  मात्र अविनाश पाटील यांनी याला आक्षेप घेतलाय. येत्या जून महिन्यात संस्थेच्या कार्यकारिणीत याबद्दल निर्णय घेण्यात येईल असं अविनाश पाटील यांनी पत्रक काढून म्हटलंय. त्याचबरोबर हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सात कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या ट्रस्टवर अवैधरित्या ताबा मिळवल्याचा आरोप  अविनाश पाटील यांनी केलाय. त्याचबरोबर नरेंद्र दाभोलकरांच्या कुटुंबीयांवर घराणेशाहीचा आरोपही त्यांनी केलाय. यावर अद्याप हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्याकडून मात्र काही प्रतिक्रिया आलेली नाही. दोन्ही गट आपलाच गट महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असल्याचा दावा करत आहेत. 


अविनाश पाटील यांनी पत्रात काय म्हटलंय...
अविनाश पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी व्यापक प्रयत्न आणि संघटनांची गरज आहे. असे संघटनात्मक काम हमीद- मुक्ता गटाने नक्की करावे, त्यासाठी नवीन संघटना स्थापन करावी, पण आधीपासुन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव वापरून समांतर कार्यपद्धती अवलंबून नये. प्रत्यक्षात स्वतः काहीही काम न करता, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करुन, संघटीत कार्यकर्त्यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये. संघटना म्हणुन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते समर्पित भावनेने काम करीत आहेत. खरे तर समाज परिवर्तनाच्या चळवळीत कार्यकर्त्यांना देण्यासारखे फार काही नसते, त्यातल्या योगदानाचे श्रेय हेच एकमेव असते.


अविनाश पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की,  वारसा हक्क आणि घराणेशाहीने एकूणच पुरोगामी चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे. संत, समाज सुधारकांची जाज्वल्य परंपरा असलेला महाराष्ट्र फुले- शाहु- आंबेडकरांचा विचार वारसा घेऊन आपला हिरक महोत्सव साजरा करीत आहे. अशा पुरोगामी महाराष्ट्राच्या 60 वर्षातील सर्वांगिण विकासाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या परिवर्तनशील चळवळींनी आपल्या मर्यादा ओलांडण्याचा देखील विचार करायला हवा. 


पत्रात पुढं म्हटलं आहे की, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची 30 वर्षांच्या संघटनात्मक कार्य‌ पद्धतीतून पुढे आलेली लोकशाही, विकेंद्रितता आणि सामूहिक निर्णय प्रकिया अनेकदा संवाद करून देखील हमीद- मुक्ता गटाला मान्य झालेली नाही. त्यामुळे घराणेशाही आणि वारसा हक्क जोपासणारा हा गट समितीपासून स्वतंत्र झाला आहे. या गटाने संघटनेने सलग जवळपास 30 वर्षे चालविलेले समितीचे मुखपत्र राहीलेले अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक ताब्यात घेतले. त्यानंतर संघटनेने 'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका' नावाचे नवे मुखपत्र सुरू केले असून आतापर्यंत त्याचे 5 हजारांहून अधिक वाचक सभासद झालेले आहेत. महाराष्ट्र अंनिसच्या आर्थिक व्यवहारांसाठी 1993 साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र नावाने सातारा येथे विश्वस्त संस्था स्थापन केली गेली होती. प्रतापराव पवार हे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शहिद डॉ नरेंद्र दाभोलकर हे संस्थापक कार्याध्यक्ष होते, त्याच कार्याध्यक्ष पदावर डॉक्टरांच्या खुनानंतर लगेच आठवड्यात भावनिक आवाहनाने त्यांच्या पत्नी, डॉ शैलाताई दाभोलकर यांच्याकडे‌ सुपुर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी सतत 25 वर्षे देणग्या व जाहिरातींच्या माध्यमातून अत्यंत चिकाटीने, कष्टाने मिळवलेली आणि काटकसर करून वाढविलेली साधारण 7 कोटी रक्कम करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती विश्वस्त संस्थांमध्ये जमा आहे. शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र विश्वस्त संस्था हमीद- मुक्ता दाभोलकर कुटुंबियांच्या प्रभावामुळे संघटनेच्या विरोधात गेली आहे आणि हमीद मुक्ता गटाने 7 कोटी रुपये असलेला संघटनेचा ट्रस्ट आपल्या ताब्यात घेतला आहे. त्या दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेने आर्थिक व्यवहारांसाठी विवेक जागर संस्था गठित करुन आपले कामकाज नियमितपणे सुरू ठेवले आहे.