स्पर्धेची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान, स्पर्धेच्या नवीन लोगोचं अनावरण करण्यात आलं. तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने अमनोरा टाऊनशिपचे विकासक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत 5 वर्षांसाठी करार केला आहे. याअंतर्गत स्पर्धेचे आयोजन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, स्पर्धेचा स्तर विविध पातळीवर उंचवावा आणि मल्लांसोबतच प्रेक्षकांचाही फायदा व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचंही सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे जिल्ह्याला तब्बल 12 वेळा या स्पर्धेचं आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. 2017 मध्ये पुण्यातील भुगाव येथे महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटके विजयी झाला होता. भूगावच्या कुस्ती आखाड्यात मॅटवर अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला धूळ चारत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली होती. तसेच 62वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जालना येथे पार पडली होती. या स्पर्धेत बुलडाण्याचा पैलवान बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला होता. बालानं किताबासाठीच्या लढतील गतविजेत्या पुणे शहरच्या अभिजीत कटकेचा 11-3 असा पराभव केला. या विजयासह बाला रफिकनं पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली होती.