मुंबई : आपल्या अतुलनीय शौर्याच्या बळावर देश संरक्षणात बाजी मारलेल्या महार बटालियनच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महार बटालियनच्या अमृत महोत्सवानिमित्त महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा गौरव केला जाणार आहे.


मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे शनिवार, 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे,सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण व भव्य सत्कार समारंभ आयोजित केला आहे.

महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युध्दकाळात आणि शांतीकाळात आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे जगभरात कीर्ती मिळवली. महार रेजिमेंटने 9 युध्दक्षेत्र सन्मान आणि 12 रणक्षेत्र सन्मान मिळविले आहेत. तसेच 1 परमवीर चक्र, 1 अशोक चक्र, 9 परम विशिष्ट सेना पदक, 4 महावीरचक्र, 4 कीर्तीचक्र, 1 पद्मश्री, 3 उत्तम युध्द सेवा पदक, 16 अतिविशिष्ट सेवा पदक, 30 वीरचक्र, 39 शौर्यचक्र पदक, 220 सेना मेडल आणि बरेच इतर पुरस्कार मिळविलेले आहेत. याशिवाय महार रेजिमेंटने 2 चिफ ऑफ आर्मी स्टाफ तसेच 2 आर्मी कमांडर भारतीय सेनेला देण्याचा मान मिळविला आहे.

शौर्यशाली सैनिकांचे स्मरण करून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यांना गौरविण्यासाठी त्यांना पुरस्कार देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. इतिहासात महार रेजिमेंटच्या पराक्रमी सुपुत्रांचा सन्मान करणारे महाराष्ट्र शासन पहिले शासन असल्याचे बडोले यांनी सांगितले आहे.

यावर्षी देण्यात येणाऱ्या 2 पुरस्कारांमध्ये महावीर चक्र मेडल आणि अनसंग हिरो मेडलसाठी प्रत्येकी 51 हजार रूपयांचा धनादेश, 16 वीरचक्र मेडलसाठी प्रत्येकी 31 हजार, 26 सेवा मेडलसाठी प्रत्येकी 21 हजार आणि 1 अति विशेष सेवा मेडलसाठी 16 हजार तर 4 विशेष सेवा मेडलसाठी प्रत्येकी 15 हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे.