मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे चालणार असा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझा महाराष्ट्र, माझं व्हिजनमध्ये व्यक्त केला आहे. याबाबत पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, 'सरकारचं नेतृत्व ज्यांच्या हातात आहे, ते सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत आणि दुसऱ्यांच्या कामात ते अजिबात हस्तक्षेप करत नाहीत.'


महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासूनच सरकारवर टीका होत आहे. महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे तीन पायांचं सरकार अशी टीका विरोधकांनी केली आहे. तर भाजप ऑपरेशन कमळसुद्धा राबवत आहे. अशात शरद पवारांनी सरकार पाच वर्षे चालणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

शरद पवार म्हणाले की, 'शिवसेना म्हणून आमचा कधी संपर्क आला नाही, पण बाळासाहेब ठाकरेंसोबत मित्र म्हणून खूप संपर्क होता. त्यांनी एखादा शब्द दिला तर तो शब्द ते पाळायचे. काँग्रेसचे निर्णय दिल्लीमध्ये होतात. आज काँग्रेसने निर्णय घेण्याचा पद्धतीत बदल केला असून सहकार्य करायचे, सरकार टिकवायचे ही भूमिका काँग्रेसमध्ये दिसत असल्याचंही पवार म्हणाले.

एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, साहित्य, संगीत,नाटक ह्या गोष्टीचा राज्यात प्रसार वाढला पाहिजे. सुसंस्कृत समाज असलेला महाराष्ट्र असला पाहिजे याची काळजीही घेणं आवश्यक आहे. आपण मराठीचे अभिमानी आहोत, पण अनेक ठिकाणी हिंदी भाषिकही आहेत. त्यामुळे भाषिक ऐक्य असणं गरजेचं आहे. असं ते म्हणाले. तसेच वाढत्या लोकसंख्येचा दबाव येतोय, पण लोकांचे जीवनमान उचावण्यासाठी नागरीकरणात अजून काम करणं गरजेचं आहे, असं शरद पवार म्हणाले.

आधुनिक शेती आणि शेतीपुरक उद्योगांवर भर देण्याची गरज असल्य़ाचं मत माझा महाराष्ट्र, माझा व्हिजनमध्ये शरद पवारांची सूचना, शेतीवरचा ताण कमी करण्याचाही सल्लाही त्यांनी दिला आहे.

दरम्यान सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? त्याचबरोबर सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होत आहे. पहिल्या सत्रात शरद पवार यांनी आपलं व्हिजन मांडलं आहे..

महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय आहे ठाकरे सरकारचं व्हिजन? 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन', सकाळी 10 वाजल्यापासून