मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजपने (BJP) कंबर कसली असून त्याची जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. मिशन 45 साठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मिशन 45 प्लससाठी भाजपनं मोठी खेळी केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र भाजपमधील अनेक मोठ्या चेहऱ्यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांना समोर ठेवत भाजपचं मिशन 45 सुरू केले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या  48 पैकी 45 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलं आहे. याच मिशनसाठीचंद्रपूरहून सुधीर मुनगंटीवार, जळगावच्या रावेरमधून गिरीश महाजन, सोलापूरमधून राम सातपुते, ठाण्यातून संजय केळकर किंवा रविंद्र चव्हाण, आणि दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकरांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. जिंकून येण्याची क्षमता या एकमेव निकषावर लोकसभेची उमेदवारी ठरणार आहे असं देखील भाजपमधील सूत्रांनी एबीपी माझाला सांगितलं. 


महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांत केंद्रीय मंत्री भेटी देत असून त्यामाध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 16 मतदारसंघ निवडले आहेत. त्यापैकी दहा मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत. 


नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता


राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीट कापण्याची शक्यता आहे.  या खासदारांच्या जागी काही नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची  माहिती सूत्रांनी दिली आहे. जे.पी.नड्डा आणि अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावर घेतला खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर  मुंबईतही काही जागांवर बदल होणार शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.  निवडणुकीसाठी भाजप प्रत्येक खासदारांची गेल्या पाच वर्षाची कामगिरी पाहूनच तिकिट देणार आहे. काही दिवसाताच नावांवर चर्चा होईल आणि यादी जाहीर करण्यात येणार आहे. 


 कोणकोणत्या जागांवर भाजप लक्ष देणार?


बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या मतदारसंघात  भाजप आपली ताकद लावणार आहे.  यामध्ये 18 मतदारसंघात भाजप विशेष लक्ष देणार आहे.


लोकसभा मिशन 45 साठीचे भाजपचे शिलेदार कोण?  


भाजपने 12 प्रमुख नेत्यांची या मिशनसाठी निवड केली आहे.  प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ असं हे गणित आहे. आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे प्रमुख नेते आहेत. 


हे ही वाचा :


ज्योतिरादित्य शिंदेंना आमदारकीचं तिकीट? आत्या यशोधरा राजे प्रकृतीच्या कारणानं लढण्यास इच्छुक नाहीत, सूत्रांची माहिती