जळगाव : मुंबईहून अकोल्याकडे पायी निघालेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीचं जळगावमध्ये अपहरण झाल्याची घटना घडली आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने या मुलीचं अपहरण झालं. या प्रकरणी अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आता मुलीचा आणि तिला पळवून नेणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत.


मुंबई इथल्या मुलुंड परिसरात मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करणारं एक कुटुंब कधी पायी तर कधी मिळेल त्या वाहनाने अकोल्याला निघाले होतं. पायी जात असलेल्या या कुटुंबाला नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकी स्वाराने लिफ्ट देण्याची तयारी दाखवली होती. ऐन दुपारच्या उन्हाची वेळ असल्याने संबंधित कुटुंबातील 17 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षीय मुलगी दुचाकीवर बसून पुढच्या प्रवासाला निघाली होती. काही किलोमीटर अंतरावर गेल्यावर तरुणाने मुलीच्या भावास पुढे पोलीस असल्याचा बहाणा करुन उतरण्यास सांगितले आणि पोलिसांची गाडी गेल्यावर पुन्हा गाडीवर बसून जाऊ, आम्ही पुढे थांबतो असं सांगितलं.


मुलीच्या भावाने यावर विश्वास ठेवला आणि तो गाडीवरुन उतरुन पायी चालू लागला. मात्र बरंच अंतर पुढे गेल्यावरही आपली बहीण आणि लिफ्ट देणारा तरुण न दिसल्याने भावाने आपबिती आपल्या आई-वडिलांना सांगितली. घटनेचं गांभीर्य ओळखून कुटुंबाने संबंधित तरुणाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा आणि अल्पवयीन मुलीचा शोध सुरु केला आहे.