मुंबईः राज्यभरात परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईसह, मराठवाडा, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत गेल्या तासाभरापासून पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान परतीच्या पावसानं महाराष्ट्रभरात धुमाकूळ घातलेला असतानाच हवामान खात्याच्या इशाऱ्यानं लोकांचे धाबे दणाणले आहेत. कारण 30 सप्टेंबरपर्यंत कोकण, मराठवाडा आणि मुंबईत अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


कोकणात पावसाचा हाहाकार

चिपळूण-खेड दरम्यान कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. ट्रॅकवर माती आल्याने चिपळूणजवळ काही गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.

रत्नागिरीत जगबुडी नदीने पात्र सोडलं आहे. पुराचं पाणी मुंबके गावात शिरल्याने गाई,म्हशी शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा हाय वेवरची वाहतूक बहादूर शेख नाका येथून कराडमार्गे वळवण्यात आली आहे.

मुसळधार पावसाने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून बहुतांश ट्रेन 3-4 तास उशीरानं धावत आहेत. गेल्या 3-4 दिवस सलग झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे सगळे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. तर बीड, लातूरमधील सगळे लघुप्रकल्प तुडुंब भरले आहेत.

राज्यात कुठे-कुठे पाऊस?

मुंबईत सध्या पावसाने उघडीप घेतली आहे. मात्र उपनगरांत संततधार सुरुच आहे.

गेल्या तासाभरापासून मुंबईत तुफान पाऊस पडत आहे. कांदिवली, मालाड, बोरिवली, अंधेरी, गोरेगाव भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं महाराष्ट्रात पावसानं धुमशान घातलं आहे.

त्याचा परिणाम म्हणून कालपासून रत्नागिरी, रायगड, मुंबईसह बीड, लातूर, नांदेड जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं.