मुंबई : कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी लॉकडाऊन पाळणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने बंद असल्याने अनेकांचे दारूचे व्यसन सुटले आहे. "गावागावातील म्हणते पारू, लॉकडाऊनमुळे माझ्या नवऱ्याची सुटली आहे दारू" असं म्हणत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी दारुची दुकाने उघडी ठेवण्यास विरोध केला.



थोड्या महसुलासाठी लॉकडाऊनच्या काळात पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर कोट्यवधी लोकांच्या आनंदावर विरजण टाकणारा अन्यायकारक निर्णय असेल. त्यामुळे दारूची दुकाने लॉकडाऊनच्या काळात सुरू करु नयेत, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. त्यासाठी रामदास आठवले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत.


काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लॉकडाऊनच्या काळात महसूलवाढीसाठी दारूची दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने सुरू करण्यास तीव्र विरोध केला आहे.

लॉकडाऊनमध्ये दारू कुठेही मिळत नाही, त्यामुळे अनेकांचे दारूचे व्यसन सुटले आहे. त्यामुळे ज्यांचे दारूचे व्यसन सुटले त्यांच्या कुटुंबात आनंद आहे. आता पुन्हा लॉकडाऊनमध्ये जर दारूची दुकाने सुरू करण्याचा विचार राज्य शासनाने केला, तर तो चुकीचा निर्णय ठरेल, असं रामदास आठवले यांनी संगितले.