गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा सदस्य नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर याने पत्नी संगीतासह शनिवार, 22 जूनला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासमक्ष गडचिरोलीत आत्मसमर्पण केले होते. यानंतर नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने एक पत्रक जारी केले आहे. श्रीनिवासने गिरीधरला भगोडा म्हटले असून, त्याला जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे. शुक्रवारी गडचिरोलीत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरीधरने त्याच्या पत्नीसह आत्मसमर्पण केले. यावेळी फडणवीस यांनी गिरीधर हा गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या नक्षल चळवळीतील शेवटचा नेता होता. त्याच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल (Naxalite) चळवळीचे कंबरडे मोडल्याचे म्हटले होते. यासंदर्भात नक्षल्यांचा प्रवक्ता श्रीनिवासने एक पत्रक जारी केले आहे.


श्रीनिवासने पत्रकात म्हटले आहे की, गिरीधर आणि त्याची पत्नी 4 जूनलाच माओवादी कम्युनिस्ट पक्षातून कुणालाही न सांगता पोलिसांकडे पळून गेले. गिरीधर मागील 28, तर संगीता ही 23 वर्षांपासून नक्षल चळवळीत कार्यरत होती. 1996 मध्ये गिरीधर नक्षल चळवळीत सहभागी झाल्यापासून वेगवेगळ्या पदांवर जाऊन त्याने दंडकारण्यातील उच्च पद प्राप्त केले. परंतु अलीकडे पोलिसांनी अनेक नक्षल नेत्यांना ठार केल्यानंतर माओवादी कम्युनिस्ट पक्षाला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याला समर्थपणे तोंड देण्याऐवजी गिरीधरने भयभीत होऊन पोलिसांपुढे शरणागती पत्करली, अशी टीकाही प्रवक्ता श्रीनिवास याने केली आहे.


दरम्यान, दिवंगत नक्षल नेते पेद्दीशंकर, जोगन्ना, मल्लेश, नर्मदाक्का, सृजनक्का, विकास, भास्कर, संजय, विनू, इंदिरा, वासू यांच्या कार्याचा उल्लेख करुन श्रीनिवास याने गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल आंदोलनाच्या 44 वर्षांच्या इतिहासात चळवळ सोडून पळणारा गिरीधर हा पहिलाही नाही आणि शेवटचाही नसेल, असे म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर एकप्रकारे पलटवारच केला आहे. 


पोलिसांनी नक्षलवादाचे कंबरडे मोडले 


गडचिरोली पोलिसांनी नक्षलवादाचे कंबरडे मोडले आणि दुसरीकडे सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. अंतिम माणसाच्या विकासाचाच हा प्रयत्न आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचू नये, हाच प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला. पण, आज तो विकास पोहोचतो आहे, हे मला अनेक दुर्गम भागात जाऊन पाहता आले आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले  होते. गडचिरोली हा आमच्यासाठी महाराष्ट्राचा शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे. म्हणून या जिल्ह्याचा विकास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. उद्योग, रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण यासाठी मोठा प्रयत्न हाती घेण्यात आला आहे. मोठी गुंतवणूक या जिल्ह्यात येत आहे. कालही काही प्रकल्पांबाबत मी बैठक घेतली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा


 25 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली मोर्‍हक्या गिरीधरचे पत्नीसह आत्मसमर्पण; माओवादी चळवळीची कंबर मोडली: देवेंद्र फडणवीस