Ajit Pawar : विश्वासदर्शक ठराव पास केला, अध्यक्ष नेमला मग मंत्रिमंडळ विस्तार का केला नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. राज्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याठिकाणी पालकमंत्री नेमणे गरजेचं आहे. त्यामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जनतेच्या वतीने मी  विनंती करतो की, मंत्रिमंडळाचा त्यांनी विस्तार करावा असेही अजित पवार म्हणाले.


शिवसेना राष्ट्रवादी युतीबद्दल काय म्हणाले अजित पवार


अतिवृष्टीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, तो दूर करावा. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे देखील उपलब्ध करुन द्यावे लागणार आहेत. ज्यांची घर पडली आहेत त्यांना मदत करावी लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले. शिवसेना राष्ट्रवादी यांच्या युतीबद्दलही अजित पवार यांना प्रस्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, यावर उद्धव ठाकरे आणि पवारसाहेब जो निर्णय घेतील त्यावर अंमलबजावणी करण्याचे काम आम्ही करु असे त्यांनी सांगितले. अनेकदा पाठीमागच्या सरकारने घेतलेले निर्णय फेरविचारासाठी घेतले जातात. तो त्यांचा अधिकार आहे. जे जनतेच्या हिताचे निर्णय असतात ते घेतले जातात. आम्ही तसे निर्णय घेतले आहेत. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक आहे. ती झाल्यानंतर मी अधिकृतरित्या बोलेल असे अजित पवार म्हणाले.



राष्ट्रपती, मुख्यमंत्री पण पण थेट करा


बाजार समितीत शेतकऱ्यांना संधी दिली त्याबद्दल दुमत असण्याचे काही कारण नाही. पण त्याचा बोजा हा बाजार समितीवर पडणार आहे. नगराध्यक्ष थेट करता, सरपंच थेट करता, मग मुख्यमंत्री पण थेट करा, पंचायत समितीचा सभापती पण थेट करा, राष्ट्रपती देखील थेट करा असेही अजित पवार म्हणाले. लोकशाहीत काही परंपरा घालून दिल्या आहेत. त्याचे पालन करावे लागते असेही अजित पवार यावेळी म्हणाले. सरपंच आणि नगराध्यक्ष एका विचाराचे असतात. बॉडी दुसऱ्या विचारांची असते. त्यामुळं बॉडीला विचारुन निर्णय घेतले जात नाहीत. मग एकहाती जाते आणि हे लोकशाहीला घातक असते असेही पवार म्हणाले. ज्यांच्याकडे मसल पावर आहे किंवा मणी पॉवर आहे तेच अशा प्रकारच्या निवडणूक लढवू शकतात असेही अजित पवार यावेळी म्हणाले. दोघांचेच मंत्रिमंडळ असल्यानं त्यांना हा निर्णय घेण्याची घाई झाल्याचे दिसत असल्याचे पवार म्हणाले. 


मध्यवर्ती निवडणुका होणार नाहीत


पावसाळी अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा चर्चेला घ्यायला पाहिजे होता. त्यावर काही सूचना आल्या असत्या. त्यावर चर्चा झाली असती, ते जास्त योग्य ठरले असते असेही अजित पवार यावेळी म्हणाले. राज्यात मध्यवर्ती निवडणूक होतील का? असा सवाल देखील अजित पवार यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, मध्यवर्ती निवडणूक होतील असं अजिबात वाटत नाही.


महत्त्वाच्या बातम्या: