लातूर: एकीकडे मराठा समाजाचा मोर्चा निघत असताना, आता दलित समाजाचेही मोर्चे निघायला सुरुवात झाली आहे. लातूरमध्ये आज दलित समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला एमआयएमनेही पाठिंबा दिला. अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी प्रमुख मागणी या मोर्चात करण्यात आली.


शहरातील आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. मराठा मोर्चाप्रमाणेच अत्यंत शांतपणे हा मोर्चा काढण्यात आला.

अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. त्याचे खटले तातडीने निकालात काढण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करावं, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावं, अशा मोर्चेकऱ्यांच्या मागण्या आहेत. शिवाय गोरक्षणाच्या नावाखाली दलित आणि मुस्लिमांवर होणाऱ्या अन्याय तातडीने थांबवावेत, अशी मागणीही करण्यात आली.

मराठा समाजाच्या मोर्चाला आमचा विरोध नाही, मात्र आमच्या न्याय हक्क मागण्यांसाठी हा मोर्चा आहे, असं यावेळी सांगण्यात आलं. या मोर्चाला एमआयएमनेही पाठिंबा दिला होता. अनेक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. सर्वच जाती धर्माच्या लोकांनी या मोर्चात सहभाग नोंदवला होता.

लातूरमध्ये येत्या 15 ऑक्टोबरला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजनही करण्यात आलं आहे.

महामोर्चाच्या प्रमुख मागण्या

  • अॅट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी

  • यासाठी खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे

  • कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी

  • मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावं

  • गोरक्षणाच्या नावाखाली दलित आणि मुस्लिमांवर होणाऱ्या अन्याय तातडीनं थांबवावे