कोल्हापूर : कोल्हापुरातल्या खवय्यांसाठी रंकाळा तलावासमोर एक नवी मेजवानी सुरु झाली आहे. गीता पवार, श्रद्धा मालकर, ऐश्वर्या शिंदे या तीन विद्यार्थिनींनी जिभेचे चोचले पुरवण्याचं मनावर घेतलं असून त्यांनी पाणीपुरीचा स्टॉल सुरु केला आहे.


गीता पवार, ऐश्वर्या शिंदे या विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी तर श्रद्धा मालकर ही आर्किटेक्टचं शिक्षण घेत आहे.
कोल्हापुरातल्या रंकाळा तलावासमोर 'यम्मिलिशिअस पाणी पुरी' स्टॉल आहे. नावाप्रमाणे थोडासा वेगळा आहे, कारण हा चालवणारा कुणी भय्या नाही, तर तिघी उच्चशिक्षित तरुणी आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून ही मेजवानी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे तिघींच्या पालकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. पण मुली उंबरठ्याबाहेर पडून स्वत:चा व्यवसाय करणार म्हटल्यावर श्रद्धाच्या घरी मात्र, थोडी धाकधूक होतीच.

'सुरुवातीला आईला भीती होती. पण नातेवाईक, लोकं काय म्हणतात याचा जास्त विचार करत नाही, आता खूप
आनंदात आहोत, असं श्रद्धा सांगते.



सकाळी कॉलेजचे लेक्चर्स अटेंड करतो, आणि संध्याकाळी स्टॉल्सवर येतो, असं ऐश्वर्याने सांगितलं. बरं, पोरीच विज्ञान शाखेच्या म्हटल्यावर स्वच्छता, हायजिन हे ओघाने आलंच. खाद्यपदार्थांचं सामान डी मार्टमधून खरेदी करतो, घरीच पुऱ्या बनवतो, पाणीही घरचंच वापरतो, असं त्यांनी सांगितलं. भविष्यात मोठं कॅफे उघडण्याचं स्वप्नही त्यांनी बोलून दाखवलं.

3 इडियट्समध्ये जसं आमीर, शर्मन आणि माधवनला जे जे करायचं होतं ते त्यांनी केलं पण त्याची वेगळी गंमत होती. तशी या कोल्हापुरच्या 3 कूकिंग इडियट्सही आपल्या शाखेपल्ल्याड काहीतरी वेगळं करु पाहत आहेत, आणि त्यात आनंद शोधत आहेत.