कराड : गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीनं माझ्यावर कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे ईडीला देणार आहे, असंही सोमय्या यांनी केला आहे. यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे देणार आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार आहे, असंही सोमय्या म्हणाले. 


नेमका काय केला आहे आरोप


सोमय्या म्हणाले की, 2020 साली कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिलिंग न होता, हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा लि या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायाचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत 7185 शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, 998 मतीन हसीनचे, तर 998 गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे 98  टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे आहेत. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी 2019-20 मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.  कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.


Kirit Somaiya : घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणाऱ्या ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही : किरीट सोमय्या


घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणारं सरकार


हसन मुश्रीफांमुळे मला अंबाबाईचं दर्शन करता आलं नाही. ठाकरे सरकार हे घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणारं सरकार आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. पोलिसांनी मला कोणत्या आदेशाअंतर्गत मला गणेश विसर्जनापासून रोखलं. मला काल सहा तास कोंडून ठेवण्यात आलं. मी हात जोडून विनंती केली की ऑर्डर दाखवा. पुराव्यासह मी कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो पण मला अडवलं गेलं, असंही ते म्हणाले. सीएसएमटी स्टेशनवर मला पोलिसांनी धक्काबुक्की देखील केली. मुंबईबाहेर जाण्यापासून रोखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मला पोलिसांनी दाखवले, असंही सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्विकारावी, असं ते म्हणाले. सत्तेसाठी तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल. उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही, असंही ते म्हणाले. पोलिसांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचंही ते म्हणाले. माझ्यावर हल्ला व्हावा ही सरकारची इच्छा आहे का? असा सवालही ते म्हणाले. 


मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. पोलिसांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये उतरले. कराडमध्ये किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान सोमय्या यांच्या आरोपानंतर आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ देखील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.


किरीट सोमय्यांचा कोल्हापूर दौरा अन् राजकीय नाट्य, कराडमधून सोमय्या पोलिसांच्या ताब्यात


हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीनं माझ्यावर कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे ईडीला देणार आहे, असंही सोमय्या यांनी केला आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत सोमय्या यांनी या कारखान्यात  मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे देणार आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार आहे, असंही सोमय्या म्हणाले.


रात्रभर हायव्होलटेज ड्रामा


भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांना मज्जाव केला होता. तरीही ते कोल्हापूरला रवाना झाले. किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त त्याठिकाणी होता. पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली आणि महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना कराड रेल्वे स्थानकात रोखलं. रात्रभर हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला. 


कराडमध्ये पोलिसांनी अडवल्यानंतर किरीट सोमय्या म्हणाले... 


किरीट सोमय्या म्हणाले की, "ठाकरे सरकार एवढं घाबरलंय मला की, आता मला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी लावली आहे. माझं भांडण प्रशासन किंवा पोलिसांसोबत नाही. त्यांनी मला सांगितलं आहे की, कराड पोलीस स्टेशनला उतरावं. मी तशापद्धतीनं उतरणार आहे. मी कोल्हापुरात अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे. आज त्यांनी मला थांबवलं, मी दोन दिवसांनी पुन्हा येणार." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी घोटाळे समोर आणतोय, हसन मुश्रीफ यांचा पहिला घोटाळा, दुसरा घोटाळा, तिसरा घोटाळा त्यासाठी कोणत्याही गनिमी काव्यानं येण्याची काहीही गरज नाही."


किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी मज्जाव


किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश काढले होते. सर्व पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्यानं दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला प्रशासनानं असमर्थता दर्शवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा विरोध पाहता दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांना विनंती होती. 


सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन हायव्होल्टेज ड्रामा


दरम्यान, काल रात्रीपासून हा हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार असं दोन दिवसांपूर्वीच त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस पाठवली आणि त्यामध्ये नमूद केलं की, हसन मुश्रीफ आणि त्यांचे कार्यकर्ते इथं मोर्चा काढणार आहेत आणि राष्ट्रवादी या मोर्चाचं स्वागत करणार आहे. त्यामुळं या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा, अशा पद्धतीचा मजकूर होता. तसेच यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये, कोल्हापूर जिल्हा बंदी असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी काल दुपारपासूनच किरीट सोमय्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला. तसेच त्यांना ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांपासून इतर भाजप नेते तिथं दाखल झाले आणि त्या सर्वांनी किरीट सोमय्या यांना मुंबईतून बाहेर जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर किरीट सोमय्याही आक्रमक झाले होते.