शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा मुंबईच्या वेशीवर, सोमवारी विधान भवनावर धडक
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 20 Jan 2019 12:12 AM (IST)
विविध मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात यासाठी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला आहे. हा मोर्चा आज नवी मुंबईत दाखल झाला असून सोमवारी विधान भवनावर धडकणार आहे.
नवी मुंबई : साताऱ्यातील शेतकऱ्यांच्या काही मागण्या गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात यासाठी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला आहे. हा मोर्चा आज नवी मुंबईत दाखल झाला असून सोमवारी विधान भवनावर धडकणार आहे. खंडाळा तहसील कार्यालयापासून हे शेतकरी अर्धनग्न अवस्थेत मुंबईच्या दिशेने पायी चालत येत आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने खंडाळ्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या होत्या. जमिनी संपादीत करताना प्रकल्पग्रस्थ शेतकऱ्यांची दिशाभूल करुन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सातारा जिल्ह्यातील केसुर्डी, धनगरवाडी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, मावशी, मोर्वे, भादे, अहिरे या गावांमधील जवळपास पन्नास शेतकरी खंडाळा येथून अर्धनग्न अवस्थेत पायी चालत मंत्रालयावर धडक देण्यासाठी निघाले आहेत. प्रकल्पग्रस्त शेतकरी व खातेदार मागील दहा वर्षांपासून जमीन संपादनाविरोधात लढा देत आहेत. यासाठी त्यांनी वेळोवेळी शासनासोबत पत्रव्यवहार केला आहे. पंरतु शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी खंडाळा येथील तहसील कार्यालय ते विधानभवन असा मोर्चा काढला आहे. सोमवारी हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंख्यमंत्र्यांकडूनही मागण्या मान्य न झाल्यास जलसमाधी घेऊ, असा इशारा शेतकऱ्यांनी या सरकारला दिला आहे.