पंढरपूर : देशातील काळा पैशावर आळा बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या. मात्र या निर्णयाचा मोठा फटका पंढरपूरमधील कार्तिकी यात्रेला आलेल्या भाविकांना बसला आहे.


यात्रेसाठी आलेल्या हजारो भाविकांच्या खिशात हजारो रुपये असूनही तहान आणि भुकेमुळे त्यांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. कार्तिकी यात्रा सोहळ्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक वगैरे भागातून आज नवमी दिवशी चार लाखांपेक्षा जास्त भाविक शहरात दाखल झाले आहेत. मात्र एटीएममधून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाच असल्याने सकाळपासून त्यांना एक कप चहासाठी देखील झगडावं लागत आहे. यामुळे वृद्ध आणि लहान मुलांचे फार हाल होत आहेत.

काळ्या पैशाविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं शस्त्र उगारलं आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मंगळवार (8 नोव्हेंबर 2016) च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात येतील.

मुंबई, नागपूर, अहमदाबाद, हुबळी अशा विविध भागातून आलेल्या सर्वसामान्य भाविकांनी मोदींच्या निर्णयाचा निषेध करत, हजारो भाविकांनी उपाशी कसं राहायचा, असा सवाल केला. तर इथे व्यापारी पैशांचा काळाबाजार करत असल्याचा आरोप काही भाविकांनी केला आहे. 500 रुपयांच्या मोबदल्यात 400 रुपये परत देत असल्याचा दावा त्यांनी केला.

पायी चालत आलेल्या दिंडीमधील वारकऱ्यांची अवस्था तर यापेक्षा वाईट आहे. नोटा कुठेच घेत नसल्याने हजारो वारकऱ्यांना काय खायला आणि जेवायला द्यायचं, असा प्रश्न दिंडी प्रमुखांना पडला आहे. चार लाखांपेक्षा जास्त भाविक शहरात असताना, हॉटेल मात्र ओस पडली आहे. व्यावसायिकांकडे भाविकांना द्यायलाही सुट्टे पैसे नसल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.

या सगळ्या प्रकारामुळे हजारो भाविकांच्या अराजकतेचे वातावरण पसरले असून वारीसाठी आलेले भाविक 'बा विठ्ठला वाचाव आता' म्हणू लागले आहेत.