Kalyan : शहरात मागील वर्षभरापासून 13 चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आतापर्यत हे सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात नव्हती. मात्र आता वाहतूक पोलीस आणि स्मार्ट सिटी यंत्रणेकडून चलान प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात कल्याणमधील 5 आणि डोंबिवलीतील 1 असे 6 सिग्नल चलान प्रणालीत समाविष्ट करण्यात आले आहेत. आज पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ही प्रणाली सुरू केली. यानंतर आधारवाडी चौकात सिग्नल तोडून जाणाऱ्या चारचाकीच्या मालकिणीला पहिले 500 रुपयाचे ई-चलान धाडण्यात आले.


कल्याण डोंबिवलीत 26 जानेवारी 2021 पासून सुरू झालेल्या सिग्नल आणि सीसीटीव्ही मुळे वाहनचालकांना काही प्रमाणात शिस्त लागली होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनेक मोठ्या गुन्ह्याची कमीत कमी कालावधीत उकल करणे शक्य झाले आहे. मात्र सिग्नल तोडल्या नंतर ईचलान धाडले जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक वाहन चालकांनी कोणतीही तमा न बाळगता सिग्नल तोडण्यावर भर देण्यास सुरुवात केली. म्हणून सिग्नल प्रणाली फक्त नावापुरतीच आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. यामुळेच ई-चलान प्रणाली सुरू करण्याची मागणी होत होती. 


शहरात 13 ठिकाणी बसविलेल्या सिग्नल पैकी आज प्रेम ऑटो, खडकपाडा सर्कल, संदीप हॉटेल, आधारवाडी चौक, कोळसेवाडी आणि डोंबिवली घरडा सर्कल अशा 6 ठिकाणचे सिग्नल ई चलान प्रणालीशी जोडण्यात आले आहेत. या प्रणालीचे उद्घाटन झाल्यानंतर माण्यवराच्या हस्ते पहिले ई चलान वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना धाडण्यात आले. हे वाहन एका महिलेच्या नावावर असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.