कल्याण : कल्याणमधलं नेवाळी अजूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनाने धगधगत आहे. शेतकरी आणि पोलिस आज पुन्हा एकदा आमनेसामने आले. नेवाळीजवळच्या चिंचवली गावात रात्री 3 वाजता पेट्रोलिंगसाठी गेलेल्या पोलिसांनी धुडगूस घातला. गावकऱ्यांच्या घरांचे दरवाजे, खिडक्यांच्या काचा, गाड्या फोडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मात्र गावकऱ्यांचे आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत.




काय आहे प्रकरण?
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांच्या लष्कराने नेवाळे गावाजवळ धावपट्टीसाठी जागा घेतली होती. मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात गेली. आता पुन्हा नौदलाने जागेवर दावा सांगत कम्पाऊंड टाकल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जवळपास 7 ते 8 गावातील शेतकऱ्यांच्या जमीन यामुळे बाधित होणार आहे.

शेतकऱ्यांचं आंदोलन
नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित केल्याच्या विरोधात नाका परिसरकार शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन केलं. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी गुरुवारी डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवर डावलपाडा गावाजवळ पोलिसांच्या सहा गाड्या पेटवल्या. तर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. यामध्ये एसीपी सुनील पाटील यांच्यासह काही पोलिस जखमी झाले आहेत.

काल झालेल्या आंदोलनानंतर आंदोलकांना थोपवण्यासाठी पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला. यात 12 आंदोलक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, कालच्या आंदोलनाप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन आणि डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.


संरक्षण राज्यमंत्र्यांकडून दखल
या आंदोलनाची संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनीही दखल घेतली असून त्यांनी आज यासंदर्भातील संबंधित विभागाची बैठक बोलावली आहे. शिवाय या प्रकरणाची सर्व माहिती भामरेंनी मागवली आहे.

विखे-पाटील शेतकऱ्यांच्या भेटीला
दरम्यान आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांची भेट घेणार आहे. यानंतर ते जखमी शेतकऱ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत.

संबंधित बातम्या

कल्याणमध्ये शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन, पोलिसांच्या गाड्या पेटवल्या

कल्याणच्या नेवाळी गावात तणाव, संरक्षण राज्यमंत्र्यांची बैठक