सांगली : सांगली शहरात सध्या सर्वत्र तडकडताईची चर्चा सुरु आहे. ज्येष्ठ महिन्यात अमावास्येला दैत्याचा संहार करण्यासाठी म्हैशासुरमर्दिनी तडकडताईचा वेश घेऊन शहराचे रक्षण करण्यासाठी फिरत असते, अशी अख्यायिका आहे.


अंगावर साडी, तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात तडकडताई धावते. जेष्ठ महिन्यात अमावस्येला सांगलीत भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरवात होते. तडकडताई, भुताची आई, असा गजर करत लहान मुले या तडकडीचे स्वागत करतात. जोगण्या उत्सव हा जेष्ठ अमावास्येला संध्याकाळी ४ वाजता सुरु होतो.

कुंभार घराण्याकडे तडकडीचा हा मान असतो. काळी साडी हातात सूप आणी चेहऱ्याला तडकडीचा मुखवटा अशा वेशात तडकडीच्या लग्नाची वरात काढण्यात येते. कुंभारखिंड, सांभारे गणपती, सिटी हायस्कूल मार्गे थेट स्मशानात संध्याकाळी ६ वाजता या तडकडताईच्या लग्नासाठी शेकडो आबालवृद्ध हजार असतात.



सूर्य अस्ताला जात असताना गव्हाच्या अक्षताने तिचा विवाह पार पडतो. विवाह पार पडल्यानंतर खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या सुपाने प्रसाद देते. या सुपाचा मार बसला की मुलांवरील इडा पिडा टळते अशी अख्यायिका आहे.

अमावस्येचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील ठराविक भागात जाऊन ती जोगवा मागते. तडकड ताईचा दरारा हा खूप मोठा असतो. लहान मुलेच नाहीत तर मोठी मुलेही या तडकडताईला प्रचंड घाबरतात. संस्थान काळापासून सुरु असलेली ही परंपरा आता 21 व्या शतकातही जपली जात आहे.

याला कोणी श्रद्धा म्हणो किंव्हा अथवा अंधश्रद्धा. मूळचा सांगलीचा माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात जरी गेला आणि त्याला विचारले तडकडताई माहित आहे का, तरी तो लगेच ओळखतो.