Jalna Rain Yellow Alert : मुंबईच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार, जालना (Jalna) जिल्हयात 26  जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ताशी 30 ते 40 कि.मी. प्रति तास वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवली आहे. तसेच 27 ते 29 जुलै या कालावधीत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 


मागील आठवड्यात जालना जिल्ह्यात झालेल्या तुरळक पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले. मात्र अनेक भागात अजूनही पाऊस झाला नसल्याने पीके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात अजूनही दमदार आणि अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक गावात भर पावसाळ्यात पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे जालनाकरांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. दरम्यान, उद्या जालना जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आल्याने चांगल्या पावसाची अपेक्षा वर्तवली जात आहे. तर तसेच 27 ते 29 जुलै या कालावधीत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


पावसाळ्यात हे करा...


विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल, तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.


हे करु नका! 


आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली आंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनो-याजवळ उभे राहू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) केशव नेटके यांनी केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


अतिवृष्टी! दोन दिवसांत नांदेडमधील 9 हजार हेक्टर शेती खरडून गेली; 2 लाख हेक्टरवरील पिके आडवी