Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोळकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्येला आज नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त पुण्यात आज  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti ) वतीनं निर्भया वॉकचे आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) हे देखील सहभागी झाले होते.  जे स्वत: ला धर्मवादी म्हणतात, जातींचा अभिमान बाळगतात त्यांना आमचा कडवा विरोध आहे. आमचा लढा थांबणार नाही. आज दाभोळरांची आठवण येत असल्याचे आढाव म्हणाले. जाती, धर्म या गोष्टी अंधश्रद्धा आहेत. त्या विज्ञानाच्या पातळीवर टीकत नसल्याचे आढाव म्हणाले. धर्मवाद्यांनी जे विरोधात जातील त्यांचे खून पाडल्याचे आढाव म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील बाबा आढाव यांनी टीका केली. 


त्यांनी नैतिक मूल्यांचा चुराडा केला, बाबा आढावांची मुख्यमंत्र्यांवर टीका


डॉ. नरेंद्र दाभोळकरांना श्रद्धांजली वाहत असताना, आज गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची देखील आठवण होत असल्याचे आढाव म्हणाले. यावेळी बोलताना आढाव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. महाराष्ट्रात नवं संकट आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दही हंडी कितीही उंच करा. त्यामध्ये भाग घेणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केलं. स्वत:पळपुटेपणा करुन राज्य मिळवले आहे. त्यांनी नैतिक मूल्यांचा चुराडा केला असल्याचे आढाव म्हणाले. आपला आधार जनता आणि नैतिक मूल्य असल्याचे बाबा आढाव म्हणाले. जनतेच्या प्रगतीची हिताची मूल्य आपल्या जवळ असल्याचे त्यांनी सांगितले.


 20 ऑगस्ट 2013 मध्ये झाली होती हत्या


पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची ओंकारेश्वर मंदिराजवळ हत्या करण्यात आली होती. रोजच्याप्रामणे मॉर्निंग वॉक करत असताना त्या दरम्यानच गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. वीरेंद्र तावडे हा या कटाचा मास्टरमाइंड असून त्यानेच सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या हल्लेखोरांना तिथं आणलं होतं असा आरोप सीबीआयनं याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात ठेवला आहे. 


कट्टरतावादी लोकांना विरोध केल्याच्या कारणामुळेच डॉ. दाभोलकर यांची हत्या घडविण्यात आली, असा दावाही सीबीआयनं यात केलेला आहे. याशिवाय डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम. कलबुर्गी यांच्या हत्येचे धागेदोरे एकमेकांशी गुंतलेले असल्यानं या सर्व हत्या एका कटाचा भाग आहेत असंही केंद्रीय तपास यंत्रणेनं स्पष्ट केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: