शिर्डी : जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे साईबाबा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. साईबाबांचा जन्मस्थानचा मुद्दा यासाठी निमित्त ठरलं आहे. परभणी जिल्ह्यातलं पाथरी की नगर जिल्ह्यातलं शिर्डी असा साईबाबांच्या जन्मस्थानावरुन पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी असा जन्मस्थान उल्लेख करत निधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता याला शिर्डी ग्रामस्थांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. गावच्या विकासाला विरोध नाही, मात्र जन्मस्थान म्हणून विकसित होणार असेल तर विरोध तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागल्याने आता सरकार काय भूमिका घेणार याकडं साईभक्तांच लक्ष लागलं आहे.


वर्षभरापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साईंचं दर्शन घेतल्यावर आपल्या भाषणात साईंचा जन्म पाथरी या गावी झाल्याचं वक्तव्य केलं आणि त्याचवेळी साईंच्या जन्मस्थानचा मुद्दा निर्माण झाला. त्यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येत राष्ट्रपतींना निवेदन देऊन आपला विरोध दर्शवला हगोता आणि आता पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा साईबाबांच्या जन्मस्थळाचा पाथरी असा उल्लेख करत निधी देण्याची घोषणा केल्यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी विरोध करायला सुरुवात केली. एखाद्या गावच्या विकासाला निधी देणार असला तर हरकत नाही मात्र साईंचं जन्मस्थान म्हणून जर विकास होणार असेल तर त्याला तीव्र विरोध करण्याची भूमिका शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी घेतली आहे.


दरम्यान खरच साईंचा जन्म कुठे झाला, साईबाबा कुठून आले याबाबत अधिक जाणण्याचा आम्ही प्रयत्न केला.. साईबाबा आगमन ते समाधी शताब्दी यावर शिर्डी गेझेटिअर ( अनटोल्ड स्टोरी )या पुस्तकाचे लेखक प्रमोद आहेर यांचेशी संवाद साधून प्रतिक्रिया घेतली मात्र त्यांनीही हा दावा फेटाळून लावत साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत अनेक ठिकाणचे दावे यापूर्वी झाले असल्याच सांगितलं.. जर वारंवार असा वाद निर्माण झाला तर साईंच्या सर्वधर्मसमभाव या संदेशाला हरताळ फासला जाईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केलीय


मुख्यमंत्र्यांच्या निधीमुळे शिर्डीतील भाविक पाथरीकडे यायला सुरुवात होतील आणि त्याचा आर्थिक फटका साईसंस्थानला बसेल अशी चर्चा आहे. तसेच मागील वर्षी राष्ट्रपती असतील किंवा आज मुख्यमंत्री यांची वक्तव्ये करताना कोणी माहिती दिलीय कोणत्या पुराव्या नुसार अशी वक्तव्य केली जाताय हे समोर येणं गरजेचं आहे.