मुंबई : राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी राज्यात सरसकट चारा छावण्या उभारल्या जाणार नाहीत, असे आज पशू व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार चारा छावण्या उभारण्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.


चारा छावण्यांबाबत भ्रष्टाचाराचे आरोप होतात, त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने ही सावध भूमिका घेतली आहे. बँक खात्यात पैसे जमा करण्यापूर्वी राज्य सरकारतर्फे पशु गणना केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील.

तर दुसऱ्या बाजुला महिला बचत गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून दिला जाईल. शेतकऱ्यांसाठी पशु संवर्धन विभागाचे चारा डेपो तयार केले जातील.

हे सर्व पर्याय वापरूनही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नाही तर, शेवटचा पर्याय म्हणून राज्यात चारा छावण्या उभारल्या जातील, परंतु राज्यात सरसकट चारा छावण्या उभारल्या जाणार नाहीत, असेही महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.