मुंबई : मागील दहा वर्षात देशाचं रक्षण करताना महाराष्ट्रातील एकूण 101 जवान शहीद झाले असल्याचं माहिती अधिकारात स्पष्ट झालं आहे. शिवाय काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्रातील 44 जवान शहीद झाले आहेत. त्यापैकी 33 जवान नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आल्यापासून शहीद झाले आहेत. 51 जवान 20 टक्के ते 70 टक्क्यांपर्यंत अपंग झाले आहेत.


जम्मू काश्मीर विषयक मोदी सरकारचे धोरण आक्रमक आहे. त्यामुळे जवानांची अधिक हानी झाली, असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाच्या टीमने माहिती अधिकाराचा वापर केला. गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील किती जवान शहीद झाले याची माहिती मिळावी, यासाठी राज्य सैनिक कल्याण विभागाकडे माहिती अधिकारामार्फत मागणी करण्यात आली होती. दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर ही माहिती मिळाली आहे. 1 जून 2009 ते 31 मे 2018 पर्यंतची ही आकडेवारी आहे.

दहशतवादी प्रशिक्षण थांबवण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केले. पॅलेट गन्सचा झालेला वापर चांगलाच वादग्रस्त ठरला होता. याच वाढत्या तणावामुळे 2017 या वर्षामध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक सतरा जवान जम्मू काश्मीरमध्ये शहीद झाले आहेत.

दहा वर्षात सातारा जिल्ह्यातील 17, कोल्हापूरचे 14 , सांगलीचे 8 जवान शहीद झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन चनशेट्टी यांनी या जवांनापैकी किती जवानांच्या कुटुंबांचं पुर्नवर्सन झालं आहे? याचीही माहिती विचारली होती. परंतु ही वैयक्तिक माहिती असल्याचं सांगत सैनिक कल्याण विभागाकडून माहिती देण्यात आली नाही.

साल             शहीद     अंपग
2009           10            17
2010            14           04
2011            08           02
2012           06            05
2013           08            08
2014           10             06
2015           08            05
2016           13            04
2017           20            निरंक
2018          04            निरंक

या ऑपरेशनमध्ये जवान शहीद झाले आहेत.

ऑपरेशन मेघदूत
ऑपरेशन रक्षक, जम्मू कश्मिर

ऑपरेशन ऑर्चीड

ऑपरेशन बीआय

दहशतवाद्यांशी सामना

ऑपरेशन फाल्कून

सुदानमध्ये शांती सेना