मुंबई : पुढील वर्षी अकरावी प्रवेशासाठी 16 टक्के आरक्षण एसईबीसी आणि 10 टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मिळणार असल्यामुळे आरक्षणाची टक्केवारी 103 टक्केपर्यंत जाईल आणि अकरावीच्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांना जागाच मिळणार नाही असा अनावश्यक समज निर्माण केला जात आहे.  परंतू, ज्या शाळांमध्ये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत 20 टक्के इन-हाऊस कोटा आहे तो इन-हाऊस कोटा यंदापासून 10 टक्के राखीव इतका करण्यात आला आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी सर्व आरक्षणानंतरही 7 टक्के जागा या खुल्या गटासाठी शिल्लक राहणार आहेत, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.


त्यामुळे दहावीच्या परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करु नये, पॅनिक होऊ नये व आपला अभ्यास नीट करुन परिक्षा द्यावी आणि चांगले मार्क मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात नक्कीच प्रवेश मिळेल असे तावडे यांनी स्पष्ट केले.

अकरावीच्या प्रवेशासंदर्भात वस्तुस्थिती स्पष्ट करताना तावडे म्हणाले की, 16 टक्के जागा एसईबीसी साठी तरी 10 टक्के जागा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी राखीव असल्यामुळे आरक्षणाचे प्रमाण हे स्वाभिकरित्या वाढणार आहे.  मुंबईत 1887 विविध शाखांची कनिष्ठ महाविद्यालये आहेत त्यापैकी 639 कनिष्ठ महाविद्यालयात इन-हाऊस प्रवेश कोटा आहे. यापैकी 306 महाविद्यालये ही अल्पसंख्याक आहेत. तर 333 वरिष्ठ माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालये ही बिगर अल्पसंख्याक आहेत.

तिथे इन-हाऊस कोटा लागू होतो. या 333 बिगर अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आपण जर गेल्या वर्षीचे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे आरक्षणाचे नियम पाहिले तर 103 टक्के आरक्षण नक्कीच होईल. परंतु, या कनिष्ठ महाविद्यालयांच्या व्यवस्थापनासमवेत आपण महिना भरापूर्वी या मुद्द्यांच्या अनुषंगाने संबंधितांशी चर्चा केली. सध्या या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा इन-हाऊस कोटा 20 टक्के आरक्षित आहे. ही आरक्षणाची पध्दत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जुन्या काळापासून आहे. तथापि, या कनिष्ठ महाविद्यालयांशी झालेल्या चर्चेअंती हे 20 टक्के आरक्षण यंदापासून 10 टक्के करण्यात आले. त्यामुळे, स्वाभाविकपणे जरी एसईबीसी, आर्थिक दृष्टया दुर्बल आणि इन-हाऊस 10 टक्के आरक्षण लागू झाले तरीही प्रवेश प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गासाठी 7 टक्के जागा या रिक्त राहतात, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

खुल्या प्रवर्गातील अनेक विद्यार्थी एसईबीसी (16 टक्के) आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्टया दुर्बल (10टक्के) या राखीव गटांमध्ये अकरावीमध्ये प्रवेशित होत असूनही 7 टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी शिल्लक राहतात. हे सर्व आरक्षण मिळून 33 टक्क्यांपर्यंत जाते. त्यामुळे एका अर्थाने खुल्या प्रवर्गासाठी या 33 टक्के आरक्षणातून अकरावीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो,असे ते म्हणाले.

तावडे म्हणाले की, गेल्या वर्षी झालेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत इन-हाऊस कोट्यामध्ये 639 महाविद्यालयांमध्ये एकूण 40156 विद्यार्थ्यांपैकी 16799 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि इनहाऊस कोटयामधील अन्य जागा या रिक्त राहिल्या होत्या. पुण्यामध्ये 836 विविध शाखांची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या पैकी 223 महाविद्यालये ही इनहाऊस कोटयातील आहेत. यापैकी 52 महाविद्यालये अल्पसंख्याक असून 171 बिगर अल्पसंख्याक आहेत. पुण्यामधील या 223 महाविद्याल्यांमध्ये गेल्या वर्षी अकरावी च्या प्रवेश प्रक्रियेत इनहाऊस कोटयातील एकूण 14274 जागांपैकी 8366 विद्यार्थ्यांनींच अकरावीत प्रवेश घेतला व अन्य इन-हाऊस कोटयातील जागा रिक्त राहिल्या, ही वस्तुस्थिती  तावडे यांनी यांप्रसगी निदर्शनास आणून दिली.