गडचिरोली : गडचिरोलीत 7 जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. या नक्षलवाद्यांवर जवळपास 32 लाखांचे बक्षीस होते. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये 3 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे.


राज्यात सध्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनाचे कार्यक्रम सुरु आहेत. गडचिरोली जिल्ह्यात यानिमित्त अत्यंत दुर्गम भागात नक्षलविरोधी जनजागृती सुरु आहे. या जनजागृतीचा फायदा लगेच दिसून आला आहे. नक्षलवादी आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेत 7 जहाल नक्षल्यांनी मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.


पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत याविषयी माहिती दिली. या 7 जहाल नक्षलवाद्यांवर एकूण 31 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस आहे. विकास पोडाली, वैशाली वेलादी, सूरज हुर्रा, मोहन कोवसा, नवीन पेंदा, कविता धुर्वा, रत्तो पुंगाटी अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.


वैशाली वेलादी ही 2015 साली भामरागड आश्रमशाळेतून पळून गेली होती. तर सुरजागड टेकड्यांवर जाळपोळ प्रकरणात आरोपी असलेली महिला नक्षलवादीही आज मुख्य प्रवाहात सामील झाली आहे. या सर्व नक्षलवाद्यांवर विविध ठिकाणी जाळपोळ, भुसुरुंग स्फोट, हत्या, दहशत पसरवणे आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.