मुंबई : 13 ते 21 ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मात्र, सदर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड - 19 ची चाचणी (RT- PCR Swab Test ) करणे अनिवार्य करण्यात आली आहे. सदर चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक ) असल्यासच संबंधितांना प्रवास करता येईल.


यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकावर बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर बसेस आज रात्रीपासून आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असतील. आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोविड - 19 ची चाचणी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही.


कोकणात मागेल त्या गावी एसटी, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा उपक्रम!


तसेच प्रवासासाठी स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता असणार नाही. असे एस.टी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. 6 ऑगस्टपासून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकावरून बसेस सुरु केल्या आहेत. आजपर्यंत तब्बल 10 हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे.


गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली जाहीर


सॅनिटाईझ केलेल्या बसेस महामंडळाने प्रवासासाठी उपलब्ध केल्या असून, कोविड-19 साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रवाशांना प्रवासामध्ये सामाजिक अंतर ठेवणे व तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासामध्ये केवळ महामंडळाच्या अधिकृत ठिकाणीच पिण्याचे पाणी व नैसर्गिक विधीसाठी वाहने थांबवण्याची दक्षता महामंडळाने घेतली आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी त्यांच्या भोजनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतः करावी अशी विनंती एस.टी महामंडळाकडून करण्यात आली आहे.


गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाची सेवा सुरू